शुक्रवारी रात्री केंद्र सरकारने सोयाबीन, सूर्यफूल, मोहरीच्या तेलावरील आयात शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे शेतकरी आणि देशी तेल उद्योगाला मोठा दिलासा लाभला असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी लातूरात पत्रकार परिषदेत दिली.
देशात सध्या सोयाबीनसारखे पीक हमी भावापेक्षा कमी भावने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. पामतेलावर ३० टक्के, रिफाइंड सूर्यफुलावर ३५ टक्के, क्रुड सोयाबीनवर ३० टक्के, तर रिफाइंड सोयाबीनवर ३५ टक्के, मोहरी तेलावर २५ आणि ३५ टक्के आयात शुल्क केले.
देशात सध्या सहाशे तेल कारखाने आहेत. त्यापैकी तिनशे बंद असून ३५० कारखाने हे अर्ध्याच क्षमतेने चालवले जात आहेत. सोमवारपासून बाजारात सोयाबीनचे भाव हमी भावाच्या किमान आसपास तरी पोहचतील अशी माझी खात्री आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे तेल उद्योगातील व्यापाऱ्यानीही आनंद व्यक्त केला असल्याची माहिती पाशा पटेल यांनी दिली.
गेल्या आठवड्यात सरकारने डाळीच्या निर्यातीवरील बंदी उठवली त्यामुळे डाळ उत्पादक आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला असून आता सरकारे सोयाबीन उत्पादकाना मदत करण्यासाठी हा नवा अध्यादेश काढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सोमवारी बाजार उघडल्यानंतर नव्या अध्यादेशाचे परिणाम दिसू लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांसाठी कितीही अध्यादेश काढावे लागले तरी ते काढेल. परंतु, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आता पर्यंतचे सरकारे ही ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय करीत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकरी आणि शेतमाल उत्पादकाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे असा निर्णय झाला असल्याचे सांगून राज्य कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीपेक्षा ही जास्त फायदा सरकारने केल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
अनेक वर्षानंतर तेलबिया आयातीवर केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवून उद्योजकांचा आणि शेतकऱ्यांचा फायदा केला आहे. माजी आमदार पाशा पटेल यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने लातूरकर म्हणून आनंद होत आहे. आम्ही सोयाबीनच्या खरेदी दरात शंभर रुपयांनी वाढ केली असून सोमवारनंतर बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात १५० रुपयांनी तर सूर्यफुलाच्या दरात दोनशे रुपयांची वाढ अपेक्षीत आहे. तेलबीयासाठी सरकारचे असेच धोरण राहिले तर शेतकरी पुन्हा सोयाबीनचा पेरा वाढवतील आणि देशातील तेल उद्योगाला पुन्हा चालना मिळणार आहे.
अशोक भुतडा, तेल उत्पादक, लातूर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट