म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
छावणीतील पाणी पुरवठा अद्यापही सुरळीत झालेला नाही. महापालिका व छावणी परिषदेच्या टँकरद्वारे पाणी वाटप सुरू असले तरी निम्म्या वॉर्डातील नागरिकांना अत्यल्प पाणी मिळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ‘मटा’कडे नोंदविल्या. जवळच्यांना भरपूर पाणी, तर इतरांना टँकरपासून दूर ठेवले जात आहे, असे दिसून आले. दरम्यान, पाइपलाइनची दुरुस्ती सोमवारी सायंकाळपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार असा सवाल करण्यात येत आहे.
दूषित पाणी पुरवठ्यामुळे १० नोव्हेंबरपासू छावणी परिसरात गॅस्ट्रोचा उद्रेक झाला आहे. आतापर्यंत छावणीच्या सामान्य रुग्णालयात गॅस्ट्रोचे तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर पावणेदोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करून घ्यावे लागले होते. गॅस्ट्रोग्रस्तांची संख्या ही १५ हजारांपर्यंत असू शकते, असा दावा केला जात आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही प्रशासनाने उशिरा कार्यवाही सुरू केली. परिणामी, पाइपलाइनमधील लिकेज शोधण्यासाठी १६ नोव्हेंबर उजाडला. त्यानंतर रविवारी रात्रीपर्यंत पाइपलाईन बदलणे व दुरुस्ती केली जाईल, असे प्रशासनाने म्हटले होते. परंतु, सोमवारी सायंकाळी सहापर्यंत हे काम पूर्ण झाले नव्हते. हे काम सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण झाले, तर पाण्याची चाचणी करून पाणी पुरवठ्यास हरकत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यास, प्रत्यक्ष पाणी वितरण होण्यासाठी मंगळवारची संध्याकाळ किंवा बुधवार उजाडणार, असे चित्र आहे. कोणत्याही टप्प्यावर दिरंगाई, विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कामासाठी रविवारी कामगार आले नसल्याने काम लांबल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, १७ नोव्हेंबरपासून पालिकेच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे व छावणी परिषदेच्या टँकरद्वारे वापरण्यासाठीच्या पाण्याचे वाटप केले जात आहे. पण, निम्म्या वॉर्डांना तोकडा पाणी पुरवठा होत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यातही वॉर्ड क्रमांक तीन, पाच, सहा आदी वॉर्डांमध्ये नागरिकांना तीव्र टंचाई भेडसावत असल्याचे नागरिकांनी ‘मटा’ला सांगितले.
नवीन जलवाहिनीला मान्यता
हॉटेल पंचवटी ते होलीक्रॉस शाळेपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाला परिपत्रकाद्वारे सर्व सात सदस्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे जुन्या जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरळीत झाला की नवीन जलवाहिनीच्या कामाकडे लक्ष केंद्रीत केले जाईल, असे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले. नवीन जलवाहिनीच्या सर्व तांत्रिक बाजू तपासूनच ती पूर्णत्वास जाऊ शकेल, असे सीईओ नायर म्हणाले.
काय म्हणतात नागरिक, सदस्य, अधिकारी…
आमच्या वॉर्ड क्रमांक सहामध्ये अत्यल्प पाणी वाटप होत आहे. चक्क चेहरे पाहून वाटप होत आहे. एकीकडे घरातील अनेकांना जुलाब व इतर त्रास होत आहेत. परंतु पुरेसे पाणी मिळत नसल्याने हाल आहेत. त्यामुळे पुन्हा रोगराईला आमंत्रण मिळत आहे. याबाबत सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे.
-अशोक गायकवाड, वॉर्ड क्रमांक सहा, छावणी
आम्ही जिथे टँकर आणू तिथून तुम्ही पाणी घेऊन जा, अशी अरेरावी केली जात आहे. पाण्याने भरलेला ड्रम कसा घेऊन जाता येईल, याचा साधा विचारही केला जात नसल्यामुळे नागरिकांना मनस्पातही सहन करावा लागत आहे. समान पाणी वाटपाकडे अजिबात लक्ष नसल्याचा त्रास आम्हाला भोगावा लागत आहे.
-गणेश परदेशी, वॉर्ड क्रमांक सहा
टँकरच्या पाणी वाटपातही जातीपातीचे राजकारण केले जात आहे. आमच्या वॉर्ड क्रमांक पाचमधील बहुतेकांना पाणी मिळत नसून त्याबद्दल सीईओंकडे तक्रार करणार आहोत. १२ दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे व त्याचे परिषदेच्या सदस्यांना कोणतेही सोयरसूतक नाही.
-प्रमेश्वर यादव, वॉर्ड क्रमांक पाच
जलवाहिनीची दुरुस्ती सोमवारी रात्रीपर्यंत पूर्ण होऊन पाण्याचे टेस्टिंग केले जाईल व त्यानंतर पम्प, टाक्या भरल्या जातील. फारोळ्यातून पाणी पुरवठा झाला, तर उद्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत नागरिकांना पाणी पुरवठा केला जाईल. यापूर्वीच पम्प व टाक्या दोनदा स्वच्छ करण्यात आल्या आहेत.
-संजय गारोल, उपाध्यक्ष, छावणी परिषद
जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे व फारोळ्यातून पुरवठा सुरळीत झाला, तर सोमवारी रात्रीच टेस्टिंग होऊन मंगळवारी पम्प व टाक्यांमध्ये पाणी पुरवठा होईल. त्यानंतर टाक्यांमधून नागरिकांना पुरवठा सुरळीत सुरू होईल.
-विजयकुमार नायर, सीईओ, छावणी परिषद
अकराव्या दिवशी ४८ रुग्ण
गॅस्ट्रो उद्रेकाच्या अकराव्या दिवशी सोमवारी (२० नोव्हेंबर) छावणी सामान्य रुग्णालयाच्या ‘ओपीडी’मध्ये ४८ रुग्ण उपचारासाठी आले, तर यातील ७ रुग्णांना दाखल करावे लागले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या सहा हजारांच्या घरात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्यांदा-तिसऱ्यांदा उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अनेक रुग्ण खासगीत तसेच घाटीत उपचारासाठी जात असल्याचेही समोर येत आहे. संपूर्ण उपचार घेतल्यानंतरही अनेकांना जेवण न जाणे, अशक्तपणाचा त्रास होणे, जुलाब होत राहणे किंवा पुन्हा जुलाब सुरू होणे, असे त्रास होत असल्याचे नागरिकांनी ‘मटा’ला सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट