टंकलेखन यंत्राच्या वापराला सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी चौकशी सुरू केली आहे. पुन्हा ‘टकटक’ सुरू होणार असल्याने अडगळीत गेलेल्या टंकलेखन यंत्रांच्या दुरुस्तीसाठी कारागिरांना मागणी वाढली आहे.
कार्यालयांमध्ये कम्प्युटरचा वापर वाढत अाहे. त्यामुळे सरकारने टंकलेखन यंत्राऐवजी कम्प्युटरच्या मदतीने टंकलेखन अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी घेतला. त्याचवेळी ३० नोव्हेंबर २०१५पर्यंत टप्प्याटप्प्यांने जुना अभ्यासक्रम बंद केला. त्यामुळे टंकलेखन यंत्रांचा वापर बंद होईल, असे सांगण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल कायम होता. वर्षभर मुदतवाढ देऊन अभ्यासक्रम सुरू झाला. या आठवड्यात शासनाने आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्याची; तसेच गरज असल्यास पुढेही विचार केला जाईल, असे संकेत दिल्याने टंकलेखन संस्थाचालकांना बळ मिळाले आहे. ऑगस्ट २०१६मध्ये टंकलेखन यंत्रांचा वापर बंद करण्यात आला, पण या यंत्रांच्या वापराला सरकारने दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे डिंसेबरमध्ये बॅचेस सुरू होत अाहेत. औरंगाबादमध्ये विद्यार्थी टंकलेखन संस्थांकडे विचारपूस करत असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. यंत्र दुरुस्तीकरणाऱ्या कारागिरांना मागणी वाढली आहे. यंत्र कारागिरांची संख्या मोजकीच आहे. यंत्र अडगळीत पडल्याने या कारागिरांना कोणी विचारत नव्हते. आता पुन्हा त्यांची मागणी वाढली आहे. मराठवाड्यात चार ते पाच जण टंकलेखन यंत्र दुरुस्तीची कामे करतात. त्यामुळे विविध जिल्ह्यांतून याबाबत विचारणा होत असल्याचे कारागिरांनी ‘मटा’ला सांगितले.
जुना अभ्याक्रम चालवणारे अनेकजण आहेत. जुना अभ्यासक्रम बंद करू नये, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कम्प्युटरपेक्षा जुन्या यंत्रावर परीक्षा देणाऱ्यांची संख्या अधीक आहे. तसे असतानाही तो निर्णय घेण्यात आला. मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा चौकशी सुरू केली आहे.
- महावीर चांदीवाल, संस्थाचालक
बंद होणार असल्याने कारागिरांवर उपासमारीची वेळ आली. वर्षभरापासून इतर कामे शोधत होतो. अनेक वर्षांपासून यंत्र दुरुस्तीचे काम करतो. हातचा रोजगार गेला तर अडचणी येतात. आता जुने यंत्र पुन्हा दुरुस्ती येत आहेत. त्यामुळे आम्हाला मागणी वाढली आहे.
- संजय डहाळे, यंत्र कारागीर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट