रेल्वेने प्रत्येक विभागात सुरक्षा व्यवस्थेचे नूतनीकरण, अद्यायावतीकरण यांसाठी निर्भया फंड हा विशेष निधी जाहीर केला होता, मात्र त्याचा खर्च करण्यात आला नव्हता. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अखेर हा निधी खर्च करण्यास सुरवात होणार आहे. या निधीतून औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे २७ सीसीटीव्ही कॅमेरे डिसेंबरअखेर पर्यंत बसविण्यात येणार आहेत.
औरंगाबाद स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याबाबत रेल्वे सुरक्षा दलाकडून दक्षिण मध्य रेल्वेला प्रस्ताव पाठविण्यात आला. वर्षभरापूर्वी निर्भया फंडचा ६६ कोटीचा निधी दक्षिण मध्य रेल्वेकडे पडून होता. याबाबत ‘मटा’ने ३१ जुलैच्या अंकात बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेला जाग आली आहे. त्यांनी ६६ कोटी रुपयांमधून विविध रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.
निर्भया फंडातून औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे २७ कॅमेरे बसविण्यात येणार आहे. हे कॅमेरे ३१ डिसेंबरपर्यंत बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
४० कॅमेरांची गरज
निर्भया फंडातून २७ कॅमेरे रेल्वे स्टेशन बसविण्यात येणार आहे. ‘आरपीएफ’कडून औरंगाबाद स्टेशनमध्ये ४० कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. याशिवाय आठ मेटल डिटेक्टरचीही मागणी करण्यात आली होती. मेटल डिटेक्टरबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट