डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) पदवीधर गटाची निवडणूक चार डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीची मतदारयादी विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्ध केली. चार जिल्ह्यात ५५ मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. अधिसभा शिक्षक व विद्या परिषद निवडणुकीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतली.
अधिसभा पदवीधर गटाची निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. अधिसभा शिक्षक व विद्या परिषद निवडणुकीत मतदारयादी तयार करण्यापासून ते निकालापर्यंत अनेक त्रुटी होत्या. मतमोजणी प्रक्रियेवर गदारोळ झाल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली होती. हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने पदवीधर निवडणुकीची पूर्वतयारी केली आहे. विद्यापीठाच्या नाट्यगृहात गुरुवारी दिडशे कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मिक सरवदे उपस्थित होते. मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने घेण्यासाठी सूचना करण्यात आल्या. प्रशासनाने पुरेपूर मार्गदर्शन केले असले तरी कर्मचाऱ्यांचा गोंधळ कमी झाला नाही. नियमावली, मतपत्रिका, मतदारयादी, मतपेटी, वेळेची मर्यादा अशा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. दूरवरील मतदान केंद्रांवर वेळेत मतपत्रिका पोचत नसल्याने मतदानाला उशीर होतो. अशा वेळी वेळेची मर्यादा वाढवणार का असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. तर दूरच्या मतदान केंद्रावरही वेळेपूर्वीच मतपत्रिका पोहचतील असे प्रशासनाने म्हटले आहे. येत्या चार डिसेंबरला मतदान असून, तीन डिसेंबर रोजी कर्मचारी नेमलेल्या केंद्रावर पोचणार आहेत. प्रशासन निवडणुकीची तयारी दाखवत असले, तरी ऐनवेळी अनेक त्रुटी समोर येतात, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीला जेमतेम तीन दिवस बाकी असताना विद्यापीठाच्या वेबसाइटवर मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांना ‘एसएमएस’ पाठवले जाणार आहेत. मागील निवडणुकीत अनेक मतदारांना ‘एसएमएस’ मिळाले नसल्याने उमेदवारांनी मतदान केंद्र आणि मतदार क्रमांकाची माहिती देण्यासाठी ‘टोल फ्री नंबर’ सेवा सुरू केली आहे. विद्यापीठ यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे सुविधा पुरवत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
जिल्ह्यांत १८ मतदान केंद्रे
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यांतर्गत प्रथमच पदवीधर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ५५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. औरंगाबाद शहरात दहा आणि प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १८ मतदान केंद्र आहेत. एकूण मतदार २९ हजार असून, तालुक्यातील एक केंद्र पुरेसे नसल्याचे उमेदवारांनी सांगितले. काही गावे तालुक्यापासून दूर असल्यामुळे तालुक्यात किमान दोन केंद्र देण्याची गरज आहे. अन्यथा, मतदानाची टक्केवारी लक्षणीय घसरण्याची शक्यता आहे.
यंत्रणा कामाला
पदवीधर निवडणुकीत पाच पॅनल रिंगणात उतरले आहेत. विद्यापीठ उत्कर्ष पॅनल, विद्यापीठ विकास मंच, शिवशाही पॅनल, परिवर्तन पदवीधर आघाडी आणि विद्यापीठ संघर्ष समिती प्रतिस्पर्धी आहेत. राजकीय पाठबळ असलेले उमेदवार व पॅनल ग्रामीण भागात स्वतंत्र यंत्रणा राबवून अधिक मतदारापर्यंत पोचत आहेत, मात्र स्वतंत्र उभ्या असलेल्या उमेदवारांना यंत्रणा राबवून मतदान करून घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यात अधिक मतदान केंद्र देण्याची मागणी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट