माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०१८च्या परीक्षेत विभागातून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. दहावीमधील परीक्षार्थींची संख्या दोन लाखांजवळ, तर बारावी पावणेदोन लाखापर्यंत पोचली आहे. दरवर्षी परीक्षार्थींची संख्या वाढताना, परीक्षा केंद्रांचे नियोजन करताना मंडळाची कसरत सुरू आहे.
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान दहावीच्या परीक्षा एक ते २४ मार्चदरम्यान होणार आहेत. फेब्रुवारी-मार्च २०१७च्या वेळापत्रकाचा विचार केल्यास २०१८च्या परीक्षा आठवडाभर आधी आलेल्या आहेत. दहावी, बारावीचे नियमित शुल्कात अर्ज भरण्याची प्रक्रिया संपली. बारावीची अतिविलंबाने अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यंदा दहावी, बारावीला परीक्षार्थींची संख्या वाढली आहे. २०१७च्या तुलनेत १५ हजाराने परीक्षार्थींच्या संख्येत वाढ होत असल्याने परीक्षा केंद्रांच्या नियोजनात मंडळाची धावपळ सुरू आहे. मागील वर्षी अतिरिक्त विद्यार्थ्यांचा प्रश्न अनेक केंद्रावर समोर आला. काही केंद्रावर विद्यार्थ्यांवर जमिनीवर बसून परीक्षा द्यावी लागली होती. यंदाही अनेक केंद्रावर तशी वेळ येण्याची शक्यता असल्याने मंडळ परीक्षा केंद्रांची नव्याने रचना करण्याचा विचार करत आहे.
‘आधार’चाही अडसर
मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च २०१७च्या परीक्षेत परीक्षार्थींची संख्या विभागात तीस हजाराने वाढली होती. यंदा ही संख्या १५ हजारांने वाढण्याची शक्यता आहे. आजपर्यंत दहावीचे एक लाख ९६ हजार अर्ज मंडळाकडे आले, तर बारावीची संख्या एक लाख ६५च्या जवळपास आहे. आणखी यात वाढ होऊ शकते, असे मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दहावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिवाळी सुट्यात आली. आधारकार्डचा मुद्दाही गाजला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रक्रियेत अधिकचे शुल्क भरून अर्ज भरावे लागले. बारावीसाठी विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन डिसेंबरपासून पुन्हा सुरू झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट