जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी प्रशासनाने तालुकानिहाय भरारी पथकांची निर्मिती करण्याचे जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद आणि पैठण तालुक्यात पथके नेमली आहेत. या पथकांकडून पाच ते सात डिसेंबरदरम्यान शाळांची तपासणी केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
शिरसे म्हणाले,‘जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेत अधिक वाढ व्हावी, यासाठी आम्ही प्रशासकीय पातळीवर काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक नेमण्याचे जाहीर केल होते. ही पथके तालुक्यातील शाळांची तपासणी करून तेथील अडचणी जाणून घेतील. शाळेत काही प्रशासकीय पातळीवरील अडचणी असल्या तर त्या सोडविण्याच्या दृष्टीने भरारी पथकाकडून पाहणी केली जाईल. औरंगाबाद, फुलंब्री, खुलताबाद आणि पैठण तालुक्यात भरारी पथके नेमली असून, पाच ते सात डिसेंबरच्या काळात या पथकांकडून पाहणी केली जाईल. उर्वरित तालुक्यांमध्येही लवकरच पथके नेमण्यात येतील.’
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांचे प्रस्ताव १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावण्याबाबत शिरसे यांनी सांगितले होते. त्याबद्दल शिरसे म्हणाले,‘बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांच्या कामांची यादी अंतिम टप्प्यात आहे. पीसीआय इंडेक्सनुसार प्राधान्यक्रम ठरविला जाईल आणि या कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या जातील. तीर्थक्षेत्र विकास योजनेबद्दलही पालकमंत्र्यांकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाईल. दलितवस्ती सुधार योजनेच्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविले असून लाभ न मिळालेल्या प्रस्तावांना प्राधान्य देण्यात येईल. त्याची यादी एक, दोन दिवसांत निश्चित होईल आणि १५ डिसेंबरपर्यंत ही सर्व कामे बऱ्यापैकी मार्गी लागतील.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट