म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) अद्याप मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही, मात्र सोशल मीडियावर वेळापत्रकांनी विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यातून ‘सीबीएसई’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. एकीकडे राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने आपले दहावी, बारावीचे वेळापत्रक पूर्वीच जाहीर केले. मात्र ‘सीबीएसई’चे वेळापत्रक अद्याप जाहीर नाही. या मंडळाच्या शाळांमधून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी, पालकांना वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. मंडळानेही अद्याप वेळापत्रक जाहीर केव्हा होईल, असे स्पष्ट केलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विविध राज्यातील निवडणुकांमुळे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यास मंडळाला अडचणी आहेत. त्याचवेळी सोशल मीडियावर तारखांचा गोंधळ अधिक संभ्रम निर्माण झाल्याने विद्यार्थी, पालक शाळांच्या मुख्याध्यापकांकडे वेळापत्रकाबाबत विचारणा करत आहेत. औरंगाबदमधून दरवर्षी ‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दोन हजार असते. मंडळ वेळापत्रक जाहीर केव्हा करते याकडे आता शाळा व्यवस्थापनांचे लक्ष लागले आहे. मंडळाने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे मुलांनी अशा वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे प्राचार्य अभिजित दिवेंनी ‘मटा’ला सांगितले.
जुन्याच तारखा
मागील दोन-तीन वर्षांमध्ये विविध राज्यातील निवडणुका परीक्षा दरम्यान येत असल्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्याची प्रक्रिया लांबत असल्याचे सांगण्यात येते. सोशल मीडियावर जाहीर होत असलेल्या तारखांमध्ये नऊ मार्च ते दहा एप्रिल दहावी, तर बारावीची नऊ मार्च ते २९ एप्रिल असे वेळापत्रक दर्शविण्यात येत आहे. मंडळ अधिकृत वेळापत्रक जाहीर करत नाही तोपर्यंत विद्यार्थी, पालकांनी अशा वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असे शाळा व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट