औरंगाबादः ‘सरकार आणि बँकांच्या संयुक्त विदयमाने बेरोजगारांसाठी देशभरात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यातून ५८६ जिल्ह्यातील २४ लाख बेरोजगारांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे लाखो जणांना रोजगार मिळाला,’ अशी माहिती या केंद्राचे राष्ट्रीय संचालक के. एन. जनार्धन यांनी दिली. औरंगाबाद दौऱ्यावर आले असता ‘मटा’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
- प्रशिक्षण संस्थेची संकल्पना काय? स्थापन कधी झाली?
- कर्नाटकातील धर्मस्थळाजवळील उजेरीतून पद्मविभूषण वीरेंद्र हेगडे यांच्या संकल्पनेवर आधारित ही संकल्पना आहे. बेरोजगार तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण बँकांमार्फत अर्थसहाय्य करावे हा उपक्रम आहे. २००९पासून हा उपक्रम सुरू झाला. बेरोजगारांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, हा त्यातील उद्देश आहे. यामुळेच याला ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था असे संबोधले जाते.
- किती बँका निगडित आहेत? किती जणांना रोजगार मिळाला?
- देशभरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकां निगडित आहेत. आतापर्यंत गेल्यासहा वर्षांत २४ लाख बेराजगरांना प्रशिक्षण दिले, असून तब्बल १६ लाख युवक स्थिरावले आहेत. त्यातील ६० टक्के तरुणांनी व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजागार दिला आहे. त्यातील यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अनुभव ऐकण्यासारखेच आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाच्या दृष्टीने अपेक्षित कर्ज प्राप्तीसाठीची प्रक्रिया आणि मार्गदर्शन देऊन त्यांना उद्योजक म्हणून पुढे येण्यास मदत केली जाते. काही शिबिरे दारिद्रय़रेषेखालील तरुणांसाठी राखीव असतात. पूर्ण वेळेचा हा उपक्रम असून बेरोजगार तरुण एक छोटी मुलाखत (इंटरव्ह्यू) देऊन या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होऊ शकतो.
- प्रशिक्षण संस्थेला कोणाकोणाची मदत आहे?
- ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, ही केंद्र सरकार, राज्य सरकार व तेथील अग्रगण्य बँकांच्या मदतीने चालते. राज्यात ३३ जिल्ह्यातील ३५ ठिकाणी संस्थेची कार्यालये आहेत. पुण्यात दोन कार्यालय आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक कोटी रुपये खर्चून संस्थेचे अद्ययावत असे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. जिल्हय़ामध्ये जागा उपलब्ध होताच प्रशिक्षण केंद्राच्या वास्तू तयार होतील. या केंद्रामध्ये बेरोजगार तरुणांना विविध व्यवसायांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षणाचे स्वरूप कसे असते?
- प्रशिक्षण पूर्व, प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रशिक्षणोत्तर मार्गदर्शन या तीन स्तरांवर हा उपक्रम पार पडतो. प्रशिक्षण पूर्व स्तरावर गावोगावी भेटी देऊन या उपक्रमाची माहिती स्थानिक रहिवाशांना दिली जाते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यक्रम या माध्यमांतून हा उपक्रम नेमका काय आहे, याची माहिती त्यांना दिली जाते. त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये तब्बल १७८ प्रकारच्या प्रशिक्षणांची व्यवस्था केली आहे.
- प्रशिक्षण आणि युवकांना अर्थपुरवठा कसा होतो?
- आमच्याकडील प्रत्येक कोर्स हा कमीकमी २५ आणि जास्तीत जास्त ५० जणांसाठी असतो. प्रशिक्षणामध्ये परिसरातील तज्ज्ञ व्यक्ती व्यवसायाचे स्वरूप पाहून आठ दिवसांपासून ते महिनाभरापर्यंत प्रशिक्षण देतात. त्यांचा खर्च सर्व बँक त्यांच्या सीएसआर अॅक्टिव्हिटीतून देते. प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे प्रशिक्षण येऊन तरुणांना प्रशिक्षण देत असतात. या प्रशिक्षणामध्ये व्यवसाय ज्ञानासोबतच व्यक्तिमत्त्वविकास, क्षमताबांधणी यांचाही विचार केला जातो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधिताला व्यवसाय करण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करणे, प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी संस्था मदत करते. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांचा दोन वर्ष पाठपुरावा घेतो. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. कर्जफेडीचे (परतावा) प्रमाणही उत्तम आहे.
- कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते?
- अन्नप्रक्रिया, कुक्कुटपालन, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, पापड-लोणचे तयार करणे, फॅशन डिझायनिंग, प्लास्टिकची फुले व हार निर्मिती, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, इलेक्ट्रिकल वायरिंग, लॅपटॉप आणि दुचाकी दुरुस्ती, कागदाच्या पिशव्या, बॅग फाईल, स्क्रीन प्रिंटिंग, तांदूळ प्रक्रिया, कापडी पिशव्या तयार करणे, फिनेल आणि साबण निर्मिती असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. १८ ते ४५ वयोगटांतील कमीत कमी आठवी अनुत्तीर्ण तरुण येथे भेट देऊन प्रशिक्षणाची माहिती घेऊ शकतो. शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी असल्याचा दाखला, रोजगार नोंदणी कार्ड आणि छायाचित्र अशा कागदपत्रांच्या माध्यमातून येथे प्रवेश मिळतो.
- आज कुठे, कुठे अशी प्रशिक्षण शिबिरे झाली? काही उदाहरणे...
- नक्कीच चांगली उदाहरणे आहेत. काश्मिरमधील काही महिला, विधवा मुस्लिम महिला, आंध्रप्रदेशमधील काही वेश्याव्यवसाय करत असलेल्या महिला, काही नक्षली भागातील तरुण, काही नक्षली चळवळ सोडून खास जीवनशैलीत राहू इच्छिणारे, काही आयआयटीएन्स तरुण प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायात स्थिरावले आहेत. वेश्या व्यवसाय करत असलेल्यांनी तो धंदा सोडून रिक्षा चालवण्यास सुरुवात केली आहे. यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. प्रत्येकावर सक्सेस स्टोरी म्हणून करता येईल, एवढे छान काम झाले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट