कन्नड तालुक्यात जून २०१८अखेर १२३ गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. तहसीलदार महेश सुधळकर, गटविकास अघिकारी विजय परदेशी व उपअभियंता अपसिंगेकर यांनी तयार केलेला संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे.
सिंचन प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला नाही. यंदाही तालुक्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यात यंदा जून ते आक्टोबरदरम्यान ६८ टक्के (५१६ मिमी) पाऊस पडल्याने विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण, बोअरवेल खोदणे व टँकरद्वारे पाणीपुरवठा हे पर्याय आहेत. त्यासंबंधीचा एक जानेवारी ते ३० जून या कालावधीसाठी संभाव्य कृती आराखडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. एक जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत ६० गावे, एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत ६३ गावांना पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचायत समितीला प्राप्त झालेल्या ८ डिसेंबरच्या पत्रामध्ये तालुक्यातील ३७ गांवामध्ये पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यातील सूचनेनुसार टंचाई घोषित गाव परिसरात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून ५०० मीटर अंतरात इतर प्रयोजनासाठी जिल्हा प्राधीकरणाच्या परवाणगी शिवाय विहीर खोदकाम करता येणार नाही. कलम २६ नुसार एक किलोमीटर परिघात पाणी उपशावर निर्बंध घातले आहेत. कलम २२ नुसार पाणी उपशावर मनाई करण्यात आली आहे.
मोठ्या गावात टंचाई
जेहूर, देवगाव रंगारी, देवळाणा, देवळी, विटा, आमदाबाद, नाचनवेल, हतनूर, आठेगाव, खेडा, मोहरा, जवखेडा, आडगाव (पि.) या प्रमुख गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या आराखड्यास पंचायत समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट