म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
‘मी कुणापुढे झुकत नाही आणि धर्मास पूजत नाही, पण बाबासाहेबांच्या मार्गावरच मी चालते. कारण मी बाबासाहेबांना समजून घेतले. खरे बाबासाहेब समजून घेतले, तरच समाजाची प्रगती होईल,’ असे प्रतिपादन आदिवासी कार्यकर्त्या व साहित्यिक नजूबाई गावित (धुळे) यांनी केले. त्या सोमवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात रमाई फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
आंबेडकरी महिला चळवळीचे मुखपत्र मासिक रमाईचा आठवा वर्धापन दिन व रमाई दिनदर्शिका २०१८चे प्रकाशन यावेळी करण्यात आले. ‘मनूस्मृती दहन दिना’निमित्त भारतीय स्त्री मुक्ती दिन हा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भीमराव बनसोड होते. सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल ( माजलगाव) व सत्यशोधक चळवळीचे के. ई. हरिदास प्रमुख वक्ते होते. व्यासपीठावर रमाई मासिकाच्या संपादक प्रा. रेखा मेश्राम होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक नजूबाई गावित होत्या. नजूबाई यांचा ग्रामीण शैलीतील संवाद उपस्थितांना अधिक भावला. त्या म्हणाल्या, ‘देशात मनुवादी चळवळ सक्रीय झाली, पण आमचा समाज तरी कुठे एकत्र आहे. वैयक्तिक स्वार्थापुढे समाजहित गौण ठरते. काळमानेवर लढा देण्याची वेळ आली आहे, पण काळाची झडप पडल्यावरच आम्ही जागे होणार का? समाजाला संविधान माहित आहे, पण खैरलांजी घटनेकडे पाहले की लक्षात येते की संविधान अंमलातच येत नाही. दुसऱ्या बाजूने समाजातही मनूवादी विचार पक्के होत आहेत. समाजातील महिला हुंडा घेतात असे समजल्यावर तर वाईट वाटते. मातीतून, वेदनेतून जन्मलेल्या आमच्या साहित्यालाही जाणीवपूर्वक एकत्र येवू दिले जात नाही.’
सत्यभामा सौंदरमल म्हणाल्या, ‘ग्रामसभेत स्त्रीचे काय काम आहे?स्त्री सरपंच होते, पण झेंडावंदन करणे आणि घरीच सह्या करणे यापेक्षा तिच्या हाती काही नाही. बौद्ध धर्मात विवाहावेळी २२ प्रतिज्ञातील १७ वी प्रतिज्ञा 'मी दारू पिणार नाही' अशी आहे, पण पती दारू पितात आणि बायकांना सर्व सहन करावे लागते. दारूवर राजकारणाचे पट रंगतात. सरकारने नुकत्याच १३०० शाळा बंद केल्या. सरकारने पालावर येऊन पहावे. पालावर शिक्षण पोचले नाही, पण दारू पोचली. या देशात माणसापेक्षा धर्म जवळचा आहे. स्त्री पेक्षा गाय जवळची आहे. संविधानाचा आधार घेत स्त्रीने गुलामीचे बंधन झुगारायलाच हवे,’ असे आवाहन त्यांनी केले. भीमराव बनसोड यांनी अध्यक्षीय समारोप केला. दैवशिला गवंदे यांनी सूत्रसंचलन, ललिता खडसे यांनी आभार मानले. यावेळी भागवताबाई मेश्राम, बुद्धप्रिय कबीर, भारत शिरसाट, शोभा खाडे, बेबिनंदा पवार, सुनंदा जाधव, जयश्री सरवदे, स्नेहा बन्सोड, संध्या साळवे, राजकन्या गोंडाणे उपस्थित होत्या.
विद्यापीठात नतभ्रष्टता
के. ई. हरिदास म्हणाले, ‘विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या लढ्यात इतके कष्ट घेतले. आज त्याच विद्यापीठात जाताना त्यांच्या नावाचा गौरव होण्याऐवजी सगळी नतभ्रष्टता झाली. विचारांचे स्वातंत्र्य उरले नाही. त्यांच्या जयंतीला शांततेऐवजी आम्ही नाचतो. आम्ही बौद्ध धर्मियांनी तर शांतता, सदाचारी, निर्व्यसनी असायला हवे, पण तसे होत नाही. समाजाला मरगळ आली आहे व हे विचार जाणीवपूर्वक पेरले जात आहेत. बाबासाहेबांच्या भल्या मोठ्या मूर्ती उभारून त्यांचेच विचार गाडून टाकण्याचा प्रयत्न होतोय.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट