म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
स्वच्छ सर्वेक्षणातील प्रमुख भाग असलेल्या स्वच्छता अॅपच्या डाऊनलोडसाठी महापालिका प्रशासनाने पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान १० नागरिकांकडून स्वच्छता अॅप डाऊनलोड करून घेण्याचे टार्गेट प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे आठवडाभरात २१ हजार नागरिक स्वच्छता अॅपशी जोडले गेले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत २५ हजारांचे टार्गेट पालिकेला पूर्ण करावयाचे आहे.
जानेवारी महिन्यात केंद्रीय पथक स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत शहरात तपासणीसाठी येणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाशी निगडित प्रत्येक बाबींवर पालिकेला काम करावयाचे आहे. स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यावरील तक्रारी सोडविण्याचे मुख्य काम आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किमान २५ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे टार्गेट गाठण्यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येकाने किमाने दहा नागरिकांकडून अॅप डाऊनलोड करून घ्यावे, असे टार्गेट देण्यात आले. शाळा, महाविद्यालय, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्थांनाही पालिकेने सहभागी करून घेतले आहे. शुक्रवारपर्यंत २१ हजार नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. किमान २५ हजार नागरिकांकडून अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. घनकचरा संकलनातही कंपोस्ट खताचे प्रभागातील प्रकल्प आणि सुका कचरा वेगळा करण्यामुळे शहराबाहेर जाणाऱ्या एकूण कचऱ्यातील १२५ मेट्रिक टन कचरा कमी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
३१ डिसेंबरपर्यंत चार हजार नागरिकांना अॅपशी जोडून घ्यावयाचे आहे. हे काम तीन दिवसांत पूर्ण होईलच. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाशी निगडीत सर्व बाबींवर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट