पान चार मेनलीड
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांच्यावर मंगळवारी (२७ मार्च) संध्याकाळी सात वाजता छावणीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
अस्मितादर्शकार म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेले आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. पानतावणे यांचे मंगळवारी (दि. २७)पहाटे २ वाजता निधन झाले होते. त्यांच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रावस्ती या नागसेनवनमधील पानतावणे यांच्या निवासस्थानापासून फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. याआधी पोलिस दलाने निवासस्थानामध्ये तिरंग्यात त्यांचे पार्थिव ठेवले व मानवंदना दिली. ट्रकवर डॉ. पानतावणे यांचे मोठे बॅनर (कटआऊट) लावण्यात आले होते. यानंतर बुद्धवंदनेची धून वाजवून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. नागसेनवन, चर्चरोड, छावणी चौक, नेहरू चौक, छावणी हॉस्पिटल, आयकर भवन मार्ग याद्वारे छावणीतील स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. पार्थिव स्मशानभूमीत आल्यावर समता सेवा दलाच्या सैनिकांनी आधी आदरांजली वाहिली. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारच्या वतीने, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी राज्य शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलिस प्रशासनातील विशेष दलाने बंदुकीच्या २१ फैरी देत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांना सलामी दिली. पोलिस बँडद्वारे अंत्यसंस्कारास वाजवण्यात येणारी धून वाजवण्यात आली. शासकीय सोपस्कार झाल्यानंतर बुद्धवंदना म्हणण्यात आली. यानंतर पानतावणे यांच्या मुली नंदिनी आणि निवेदिता यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी अंत्यसंस्काराच्या चौथऱ्यावर पानतावणे यांचे जावई, नातवंडे, अजय आठवले व कुटूंबिय उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक हरपला- आठवले
'पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे हे आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक होते. त्यांच्याकडून मी वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांच्या कार्याचा तो गौरव होता. त्यांचे योगदान आंबेडकरी चळवळ कायम लक्षात ठेवेल. वैचारिक चळवळ पोरकी झाली आहे. त्यांना भारत सरकारतर्फे, माझ्यातर्फे आणि आंबेडकरी जनतेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉ. गंगाधर पानतावणे यांना श्रद्धांजली वाहिली. रावसाहेब कसबे म्हणाले, 'चाळीस वर्षांपासून माझ्या आयुष्यात त्यांचे मोलाचे स्थान होते. त्यांनी तीन साहित्याच्या पिढ्या घडवून मार्गदर्शन केले. त्यांच्यामुळे साहित्य परदेशात गेले. उद्याचे समीक्षक, साहित्यिक त्यांना, त्यांच्या योगदानाला कायम लक्षात ठेवतील. यानंतर राज्यसरकारतर्फे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आमदार विक्रम काळे, मसापचे कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह काही मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करत डॉ. पानतावणे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मान्यवरांची उपस्थिती
महापौर नंदकुमार घोडले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, डीसीपी ठाकरे, डीसीपी मुंडे, कोळेकर, आमदार विक्रम काळे, आंबेडकरी चळवळीतील बाबुराव कदम, मिलिंद शेळके, कौतिकराव ठाले पाटील, रा. स्व. संघाचे दिवाकर कुलकर्णी, समरसता मंचचे रमेश पांडव, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमोहन ओबेरॉय, ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे, अशोक तेजनकर, विद्यापीठाचे कुलगुरू बाळू चोपडे, रतन पांडागळे, विजय मगरे, गंगाधर गाढे, बी. एच. गायकवाड, संजय गायकवाड, माणिक सावन्त, शकुंतला धांडे, जालिंदर शेडगे, विलास वैद्य, पंकज भारसाखले, वैशाली प्रधान, विलास कटारे, कल्याण काळे, द्वारकाभाऊ पाथरीकर, इंद्रजित आलटे, अणासाहेब खंदारे, विजय बोराडे यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षिणक, क्षेत्रातील शहरातील व राज्यातील हजारो मान्यवर आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.