मिलकर बोलो जय महावीर
महावीर जयंती उत्साहात साजरी, मिरवणुकीतून सामाजिक संदेशाचे दर्शन
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
जगाला 'जिओ और जिने दो'चा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती औरंगाबादेत गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीतून जैनबांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, बेटी बचाव, शाकाहार याबाबत जनजागृती केली. सजीव, निर्जिव देखाव्यातून समाजजागृतीचे दर्शन घडवीत, पारंपारिक ढोल ताशा, लेझीम पथकांच्या सादरीकरणाने शहरवासीयांची मने जिंकली.
सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी सिडको एन तीन येथून १०८ कारची फेरी काढण्यात आली. ही फेरी महावीरचौकात पोचली. तिथे धर्मध्वजवंदन करण्यात आले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा, आमदार सुभाष झांबड, जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया, महावीर पाटणी, प्रशांत देसरडा, विकास जैन, रवींद्र मुगदिया आदींसह पदाधिकारी व सकल जैन समाजाचे मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर उत्तमचंद ठोळे छात्रालय व गुरुगणेश नगर येथे परंपरेप्रमाणे धर्मध्वजवंदन झाले.
महावीर जयंतीनिमित्त असलेले मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणूक. पैठण गेट येथून मिरवणुकीला सकाळी प्रारंभ झाला. आचार्य कुशाग्रनंदी महाराज, पुनीतसागर महाराज, आगमसागर महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झाला. औरंगाबादमधील महावीर जयंती उत्सव पाहण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी समाजबांधवांमध्ये असलेला एकोपा वाखाखण्याजोगा आहे. तो कायम ठेवावा. भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशाची आपण अंमलबजावणी करावी, असे आवाहन कुशाग्रनंदी महाराज यांनी मार्गदर्शन करताना केले. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, डॉ. कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर त्र्यंबक तुपे, बसवराज मंगरुळे, दयाराम बसैये, अनिल मकरिये, प्रशांत देसरडा, विकास जैन, सुरेंद्र कुलकर्णी, समीर राजूरकर, नगरसेवक नितीन चित्ते, किर्ती शिंदे, गोपाल कुलकर्णी, महेश माळवतकर, मनीषा भन्साळी, जयश्री वाडकर, जीएसए अन्सारी आदींची मिरवणुकीत उपस्थिती होती. मुलींचे लेझीम पथक, ढोला ताशा पथक विशेष आकर्षण ठरले.
पैठणगेट, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, शहागंज मार्गावरून मिरवणूक निघाली. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी मार्गावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी स्वागतफलक उभारले होते. चौकाचौकात पिण्याचे पाणी, सरबत, खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. समितीने जाहीर केल्यामुळे प्लास्टिकमुक्त मिरवणुकीचे दर्शन या मार्गावरून झाले. मिरवणुकीनंतर सकल जैन समाजातर्फे सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. आमदार सुभाष झांबड यांच्यावतीने वृक्ष भेट देण्यात आले. महावीर जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महाप्रसादाच्या ठिकाणी करण्यात आले. ३०० जणांनी रक्तदान केले. वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मिरवणूक मार्गाची स्वच्छता करण्यात आली. उत्सवासाठी समितीचे मुकेश राहुजी, भारती बागरेचा, अनिल संचेती, करुणा राहुजी, मिठालाल कांकरिया, रमेश घोडके, भावना सेठिया, राजेश मुथा, निलेश पहाडे, मंगला गोसावी, मधू जैन, मंजू पाटणी, नरेंद्र अजमेरा, मंगला पारख, कविता अजमेरा, विलास राहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, अनिल संचेती, प्रवीण भंडारी, कल्पेश गांधी, विकास रायमाने, पियुष कासलीवाल, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, अंकुर साहूजी, रवी लोढा, मीना पापडीवाल, वासंती काळे आदींसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
………….
चौकट क्रमांक एक
…………….
महावीर रसोईघर गाडीचे लोकार्पण
महावीर जयंतीनिमित्ताने सकल जैन समाज समितीतर्फे महावीर रसोई घर गाडीचे लोकार्पण करण्यात आले. ही गाडी ३६५ दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातातील रूग्णांना अन्नदान करणार आहे. अजित अलर्ट ग्रुपचे व्यवस्थापन राहणार असून रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना दररोज भाजी, पोळी, वरण, भात मोफत दिले जाईल.
………..
चौकट क्रमांक दोन
………….
कार मिरवणुकीतून सामाजिक संदेश
……….
सिडकोतील ज्युनिअर रॉयल जैन ग्रुपच्या वतीने १०८ कारची मिरवणूक काढण्यात आली. त्यातून कचरा व्यवस्थापन, क्लीन सिटी-ग्रीन सिटी, साक्षरता, वाहतूक व्यवस्थापन, वीज वाचवा, पाणी वाचवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, जैन धर्माची शिकवण, जैन साधू संतांची शिकवण, भगवान महावीर यांचे विचार यांची शिकवण संदर्भात घोषवाक्य ठेवण्यात आले होते. त्यातून सामाजिक संदेश देण्यात आला.
…….
चौकट क्रमांक तीन
………………
सामाजिक देखावे ठरले आकर्षण
……….
तेरणा स्वाध्याय मंडळातर्पे जैन धर्म, आत्मधर्म आहे. याची माहिती देणारा देखावा सादर करण्यात आला. जैन श्वेतांबर तेरापंथ सभेच्या वतीने सर्वधर्मसमभाव अहिंसा यात्रा, वर्धमान रेसिडेन्सी चे ढोलताशा पथक व जैन कल्चर ऑफ इंडियाचे सादरीकरण सर्वांची दाद देऊन गेले. शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळाने भूमिश्री संपन्नकिर्ती महाराजांच्या जीवनचरित्राची महती सांगणारा निर्जिव देखावा सादर केला होता. भारतीय जैन संघटनेने पाणीबचावचा संदेश दिला. जोहरीवाडा येथील संस्कार महिला मंडळाने भगवंतांचा जन्मोत्सव, सुमतीसागर पाठशाळा, राजाबाजार यांनी चारगतीवर आधारित संदेश देणारा देखावा मिरवणुकीत सादर केला. पी. यू. जैन विद्यालयाने ओला व सुका कचरा विलगीकरण कसे करावे ? याची माहिती दिली. शिवाजीनगर येथील भगवान मल्लीनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने तीर्थ, राजाबाजार येथील मंडळाने बाहुबली महामस्तकाभिषेक, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर विष्णूनगर यांच्यावतीने शेषनाग अभिषेक, कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल जैन मंदिर सिडको एन नऊ यांनी इंडिया को भारत बनाना है या धर्तीवर देखावा सादर केला. दहेगाव बंगला (ता.गंगापूर) येथील हातमाग प्रशिक्षण केंद्र, चंद्रप्रभू खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर हडको यांनी 'अहिंसा व भारत' जैन समाजाचे योगदान हा देखावा सादर केला. कुलस्वामिनी प्रतिष्ठानने शुद्ध आहार शाकाहारचा संदेश दिला. चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जयभवानीनगर यांनी नियोजित मंदिराची प्रतिकृती देखाव्यातून सादर केली. कल्पतरू कुंथूनाथ खंडेलवाल दिगंबर जिनालय बालाजीनगर यांनी पंचकल्याणक महोत्सवाचा देखावा सादर केला. अरिहंतनगर येथील भाविकांनी राजस्थानी नृत्य सादर केले. भगवान महावीर जिनालय, सुराणानगर यांनी सजीव देखावा साकारला होता.
…….
चौकट क्रमांक चार
………….
मिरवणूक मार्गावर खाद्यपदार्थ
………..
मिरवणूक मार्गावर भाविकांसाठी चॉकलेट, सरबत, राजगिरा लाडू, चिक्की, आवळा, थंडाई, बिस्किट आदी खाद्यपदार्थ विविध संस्था, संघटना, संयोजकांच्या वतीने ठेवण्यात आले होते.
……..
चौकट क्रमांक पाच
……………….
मिरवणुकीतील घोषणा
………………………………
महावीरका क्या संदेश- जियो और जिने दो
क्या कहते है वीर भगवान - करो स्वयं अपना कल्याण
तन को करता कौन खराब - अंडा, मांस और शराब
रामराज्य को लाना है - शाकाहार अपनाना है
अहिंसामयी धर्म की जय हो जय हो
माँ का बेटा कैसा हो - भगवान महावीर जैसा हो
वाणी को वीणा बनाओ - जैन धर्म को सब अपनाओ
पुण्य पाप तो कर्म है - वीतरागता धर्म है
जैन धर्म के मीठे बोल - सत्य अहिंसा है अनमोल
महावीर के संदेशो को जीवन मे अपनायेंगे
.....
चौकट क्रमांक सहा
……......
२१ मशीन भेट
…........
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त महापालिकेला सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणाऱ्या २१ मशीन भेट म्हणून दिल्या. शहरात सध्या कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. त्यादृष्टीने सॅनिटरी नॅपकिन बायोवेस्टची अडचण दूर व्हावी, यासाठी पालिकेला सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणाऱ्या २१ मशीन भेट दिल्या. एका मशीनची किंमत २० हजार रुपये आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सकल जैन समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रेल्वेस्टेशन जैन श्रीसंघ, डीकेएमएम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, सिडको रॉयल ग्रुप, तेजस्विनी ग्रुप, सखी मंच महिला ग्रुप, जैनम महिला मंच, रॉयल लायन्स क्लब, रविंद्र खिंवसरा, ए.एम.पी. इन्फ्रा ग्रुप, श्री महावीर इंटरनॅशनल मेट्रो सिटी, सकल जैन ब्लू बेल परिवार, साई सिद्धांत असोसिएटस, प्रसादकुमार कुंकळोल, के. के. व्हेंचर्स, पी. यू. जैन हॉस्टेल, ओसवाल जैन ट्रस्ट, सकल जैन समाज औरंगाबाद ए व बी आदींनी आर्थिक मदत केली. जन्मोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मशीन महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
………………..