आम्ही औरंगाबादला मागील साठ-पासष्ट वर्षांपासून स्थाईक आहोत. येथे मराठवाड्याचे प्रसिद्ध संगीततज्ज्ञ पं. नाथ नेरळकर यांच्याकडे भीमशास्त्रीय संगीत थोडेफार शिकले. गांधर्व महाविद्यालयाच्या काही परीक्षेत मी उत्तम यश मिळविले. मला अगदी लहानपणापासूनच शास्त्रीय संगीताची आवड आहे. औरंगाबादला होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमास मी आवर्जून जाते. गेल्या ६४ वर्षांपासून पुण्यात होणाऱ्या या सवाई गंधर्व संगीच महोत्सवाचं नाव अनेक वर्षांपासून ऐकत होते, पण आपलं घर-संसार मुले, नोकरी सोडून पुण्यात पाच-सहा दिवस या संगीत महोत्सवासाठी जाणे शक्य नव्हतं, पण कधीकधी पुसट कल्पनाही सत्यसृष्टीत येतात म्हणे, तसेच झाले.
आमचा मुलगा राजीव हा इ.स. २००० ला त्याच्या कामामुळे पुण्यातच स्थायिक झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तो पुण्यात आहे तरी या संगीत महोत्सवात जाण्याचा विचार त्याच्या किंवा माझ्या मनात एकदाही डोकावला नाही, पण अचानक डिसेंबर २०१२ ला राजीवने मला फोन केला व सांगितलं की आई, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सवाई महोत्सव आहे. तू बाबांना घेऊन इथं यावंसं असं मला खूप वाटतंय. तुझी शास्त्रीय संगीत ऐकण्याची इच्छा व आवड पूर्ण करायचीय आम्हाला. चार-पाच दिवस दररोज सहा ते सात तास उत्तमोत्तम गायक, वादकांचे श्रवणीय कार्यक्रम असतात. पुण्यात मी १२ वर्षांपासून आहे पण कामाच्या घाईत तुला या कार्यक्रमासाठी येथे बोलवावं हे लक्षातच आले नाही. मला शास्त्रीय संगीताचं फारसं ज्ञान नाही, पण तुझ्याबरोबर हा संगीताचा कार्यक्रम पूर्ण ऐकायचं ठरवलं आहे. केवळ तुझ्यासाठी.
त्याचा फोन पूर्ण झाल्यावर विचार करता माझ्या लक्षात आलं की, ही गोष्ट अशक्य आहे. कारण आम्ही दोघेही वयोवृद्ध झालो आहोत. माझे पती नुकतेच बाथरूममध्ये पडल्यामुळे अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना अशा स्थितीत पुण्याला नेणं कसं शक्य आहे? मी राजीवला फोन करून सांगितले की, तुझी-माझी आवड पूर्ण करण्याची इच्छा चांगली असली तर आमचं येणं अशक्य आहे. त्यावर राजीव म्हणाला, 'मी या सर्व गोष्टींचा पूर्ण विचार करूनच सर्व ठरवलं आहे. काही काळजी न करता सर्व गोष्टी माझ्यावर सोड. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना?'
यावर मी माझ्या पतींना विचारले तर ते म्हणाले, 'अगं, राजीव, मनीषा (सूनबाई), निमीष (नातू) तिघांनाही आपण पुण्याला यावं असं वाटत असेल तर आपण जरूर जावू. संगीत महोत्सवास तू राजीवसोबत जा. मी सून व नातवाबरोबर घरी राहीन. आपल्या आईची आवड पूर्ण करावी असं वाटणं किती कौतुकाची गोष्ट आहे.
आमचं पुण्याला संगीत महोत्सवाला जायचं ठरलं. राजीव स्वतः पुण्याहून रुग्णवाहिका घेऊन औरंगाबादला आला. माझ्या पतींना हळूवारपणे उचलून रुग्णवाहिकेत झोपवले. पूर्ण प्रवासात त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिले. पुण्यात विमान नगरमध्ये घरी आल्यावर काळजीपूर्वक त्यांना त्यांच्या स्वतंत्र खोलीत झोपवले. त्यांचं जेवण-बाकीची सर्व प्रकारची सेवा व्यवस्थित केली. संगीत महोत्सवास पुण्याला जाण्याचा हा आमचा कार्यक्रम न चुकता पाच वर्षे राजीवने पूर्ण केला. दुर्दैवाने आठ महिन्यांपूर्वी माझ्या पतींचं निधन झालं. त्यामुळे संगीत महोत्सवास यावर्षी येण्याची माझी इच्छा नव्हती, पण राजीव-मनीषा म्हणाले, 'आई, तुझ्यासाठी बाबा एवढा त्रास घेऊन पुण्याला यायचे. तू जर आली नाहीस तर त्यांना वाईट वाटेल.'
नुकत्याच संपलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पतीची आठवण येऊन मन भरून यायचे. डोळ्यांत सारखे अश्रू यायचे, पण या अमर, शुद्ध संगीतातच माणसाचं दुःख दूर करून मन हलकं करण्याची शक्ती आहे हेही लक्षात आलं. अशाप्रकारची अमर, तीर्थप्राय अशी स्वरयात्रा आपल्या आईला घडविणारा पुत्र मातृभक्तच म्हणावा लागेल.
- डॉ. वनमाला पानसे, औरंगाबाद