म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद पाकिस्तानने अचानक केलेल्या भेकड हल्ल्यात वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी झुंज देत जम्मू-काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात शहीद झालेले जवान शुभम मस्तापुरे (रा. कोनेरवाडी, जि. परभणी) यांचे पार्थिव बुधवारी औरंगबाद विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्यदलातर्फे त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावात एका शेतकरी कुटुंबात शुभम यांचा जन्म झाला होता. वर्षभरापूर्वीच ते लष्करात दाखल झाले होते. जम्मू-काश्मीरमधील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर मंगळवारी पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी शुभम शहीद झाले. शुभम यांचे पार्थिव मोटारीने पहाटेपर्यंत कोनेरवाडी येथे पोहचणार असून, गुरुवारी (५ एप्रिल) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी बुधवारी शुभम यांचे पार्थिव उधमपूरहून विशेष सैन्याच्या विमानाने सुभेदार उत्तम चौगुले यांच्या उपस्थितीत औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले. येथे शुभम मुस्तापुरे यांचे नातेवाईक तसेच मित्र परिवारातील बाबूराव पांढरे, शांता पांढरे, शशीकला चपटे, मनोरमा चपटे, जयश्री कामजळगे यांच्यासह रमेश घाडगे यांची उपस्थिती होती. विमानतळावर आलेल्या पार्थिवाला विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, पोलिस उपायुक्त दीपाली घाटे, सैनिक कल्याण विभागाचे रावसाहेब गोरे यांनी श्रद्धांजली वाहिली. भारतीय सैन्य दलातर्फे शुभम यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी स्टेशन डेप्युटी कमाडंट पी. किरण कुमार, कर्नल एस. जी. मेनन, कर्नल डी. के. राना, मेजर मनीष कुमार यांनीही श्रद्धांजली वाहिली. ………… \Bनिकराचा प्रतिहल्ला; अन् धारातीर्थी \B'पाकिस्तानने उधमपूर येथे मंगळवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान गोळीबार सुरू केला. कर्तव्यावर हजर असलेले शुभम मुस्तापुरे यांनीही निकराने प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात शुभम शहीद झाले. तर त्यांच्या सोबत असलेले तीन जण जखमी झाले,' अशी माहिती उधमपूर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटचे सुभेदार उत्तम चौगुले यांनी पत्रकारांना दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट