स्नेहाली प्रकाश कुलकर्णी, औरंगाबाद
'अरे पाणीपुरी मुळे पित्तं वाढतं तुझं मग कशाला खातो. अगं वडापाव खाऊ नको, वजन वाढेल ना. अरे बाहेरचे खाऊ नका, कोण जाणे कसल्या तेलामध्ये बनवलंय', असे संवाद आपण रोजच ऐकत असतो आणि यावरचे उत्तर देखील भन्नाट देतो. 'मी रोज दवाखान्याचे बिल भरेल, पण पाणी पुरी, भेळ वडापाव, समोसे यांच्यासोबत नो कॉम्प्रमाईज. काहींचा अॅटिट्यूड तर असा असतो की 'खाण्यासाठी जन्म आपुला' (इथे खाणे म्हणजे ताटात घेऊन खाणं टेबलखालून नव्हे.)
आपण भारतीय ना खाण्याच्या बाबतील एकदम बिंधास्त असतो. जिभेचे चोचले पुरवण्यात आपण अगदी माहीर आहोत. त्यात चाट हा आपल्या अगदी जवळचा विषय. खाद्यसंस्कृतीने संपन्न अशा भारतीय पदार्थांची चव जशी भन्नाट तशीच त्याच्या उगमाची गोष्ट देखील भन्नाटच आहे. आपला इंडिया असो कि भारत या दोघांत जर कोणती गोष्ट कॉमन असेल तर ती म्हणजे आपल भारतीय खाद्य. मग ते आंध्रातील इडली, चटणी, वडा, डोसा, सांबार, असो कि महाराष्ट्राचा वडापाव, पुरण पोळी असो, राजस्थानची दाल बाटी असो कि, बिहारचा पालक पनीर, पंजाबचे छोले असो कि गुजरातचा ढोकला, हे पदार्थ केव्हाच आपल्या राज्याच्या सीमा ओलांडून प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि घरात जाऊन पोहोचले आहेत. भारतात श्रीमंलातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब माणूस आपलं स्टेट्स बाजूला ठेऊन चाटच्या ठेल्यावर जमा होतात. भैय्या यही तो खासियत है हमारे इंडिया की.
खाद्य संस्कृती ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्या लोकांना एकत्र बांधून ठेवलंय. म्हणजे बघा राजकीय आणि धार्मिक वाद कितीही विकोपाला गेले असले तरी हिंदू आणि मुस्लिम या दोन संस्कृतींनी हातात हात घालून एक सुंदर अशी खाद्य संस्कृती घडवली व विकसित केली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. जरी भारतामध्ये आपल्याला जातीयता आणि धार्मिक तेढ वाढताना दिसत असेल तरी त्याचा प्रभाव आपल्याला जेवणात कधीच दिसून आला नाही. दंगे झाल्यानंतर देखील मंदिरासमोर प्रसादाचे लाडू विकणाऱ्या मुस्लिम आजोबांना मी पाहिलयं आणि बाहेर जातीय दंगे सुरू असतानाही घरात कुलाचारचं जेवण अगदी गरम गरम पुरणपोळी खान चाचांना आग्रहाने खाऊ घालणाऱ्या आमच्या आजीला देखील मी पाहिलंय. तेव्हा लक्षात आलं की एकमेकांबद्दल आपल्या मनात तेढ नाहीच आहे आणि प्रत्येकाच्या घरातलं ताट ही तेढ मिटविण्यात अग्रेसर आहे. आता हेच पहा ना स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यासोबत बसून जेवण करत मग जात धर्म तेव्हा मध्ये येत नसत, भारताचा सम्राट अकबर अमृतसर गुरुद्वारात सर्व सामान्यांसोबत बसून लंगरमध्ये जेवला होता म्हणे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात दिसून येतात. इतिहास आपल्याला शिकवतो आपण योग्य ते शिकणे आवश्यक आहे.
भारतीय खाद्य संस्कृती ही अतिशय प्राचीन असली तरी वैविध्यपूर्ण, आणि संमिश्र स्वरूपाची आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय खाद्य संस्कृतीला अनेक वर्षांचा इतिहास आहे. मात्र, तिला जास्त प्रसिद्धी मिळाली ती मध्ययुगात झालेल्या विविध आक्रमणांमुळे. त्याचे झाले असे की मध्ययुगात भारतात मोठ्या प्रमाणात परकीय आक्रमणे झालीत युद्ध झाले अन् इस्लामिक सत्ता येथे रूढ झाली, मुघल भारतात आल्यानंतर मुघालाई करी, कबाब आणि भारतीय मसाले यांचा उत्तम मिलाप होऊन मुघलाई खाद्य संस्कृती उदयास येऊन झपाट्याने प्रसिद्धीस आली. भारतात विविध काळात विविध ठिकाणावरून येऊन अनेक राजघराण्यांनी राज्य केले प्रत्येक घराण्याने आपली नवीन पाककृती पुढील पिढीला भेट केली. मांसाहार प्रिय असणाऱ्यांसाठी तर खाद्य पदार्थांची पर्वणीच या राज घराण्यांनी देऊ केली. औरंगाबादमध्ये असलेला नान कलिया हा त्यातलाच एक भाग. मग शाकाहारी तरी का मागे राहणार. आमच्याकडे विविध डाळी व मसाले वापरून आमटीचा पदार्थ रूढच होताच की. मसाले हे भारतीय जेवणाचे सर्वात महत्त्वाचे अंग. एकीकडे आम्ही चायनीज, पंजाबी. गुजराथी. साउथ इंडियन सर्व प्रकारचे जेवण अगदी चवीने खातो मात्र मसालेदार वाग्यांची भाजी, झणझणीत लसणाचे वरण, भुरका, भाकरी या टिपीकल मराठी जेवणाची सर कशालाच नाही.
महाराष्ट्रापुरतं बोलायचं झाले तर आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण समारंभ आहेत. सुख-दु:खाचे अनेक प्रसंग आहेत आणि त्या प्रत्येक प्रसंगासाठी काही खास पदार्थ देखील आहेत. जसे दिवाळीला फराळ, श्राद्धाची खीर, कुलाचाराचे जेवण, पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, नारळी भात, कटाची आमटी, भजे, धपाटे, थालीपीठ असे एक ना अनेक खाद्य पदर्थांची रेलचेल आपल्याला दिसून येते. भारतीय जेवण याच्या अनेक गमती जमती आहेत यावर लिहाल तेवढं कमीच, कारण आपण भारतीय जिभेचे चोचले पुरवण्यात अव्वल.