म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'शहरातील कचराप्रश्नी करा किंवा मराची स्थिती निर्माण झाली आहे. लवकर तोडगा निघाला नाही तर प्लेग, रोगराई पसरण्याची भीती आहे. आता गप्प बसून चालणार नाही. कामे करा अन्यथा अडचणीत याल,' असा इशारा देत विभागीय आयुक्त तथा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी गुरुवारी महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.
डॉ. भापकर यांनी अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वर्ग घेतला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, शहर अभियंता सखाराम पानझडे तसेच शहरातील सर्व वॉर्ड अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता जवान यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. भापकर म्हणाले, 'कचराप्रश्नी शासनाने आर्थिक भार उचलला, पंचसूत्री देत मदतीला ओएसडी दिले. आतापर्यंत सक्षमीकरण होण्याची गरज होती, मात्र असे झाले नाही. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. कोणत्याही भ्रमात राहू नका. असे असेल तर अडचणीत याल. शासनाने नेमलेल्या सनियंत्रण समितीचे काम केवळ देखरेख करण्याचे आहे. कामे मात्र तुम्हालाच करायची आहेत. सनियंत्रण समितीच सर्वकाही करणार हे डोक्यातून काढून टाका, अशीच स्थिती असेल तर संबंतधितांवर कारवाई करण्याची तसेच वेळ पडली तर अधिकारी बदलण्याचे निर्देश पालिका आयुक्तांना दिले आहेत. या कार्यशाळेत एकूण ११५ स्वच्छता जवानांपैकी किती जवान हजर आहेत? किती वार्ड अधिकारी तसेच किती स्वच्छता निरीक्षक हजर आहेत?,' असे विचारत त्यांची परेड आयुक्तांनी घेतली व प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा संकलित करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, 'शहरात ही परिस्थिती महापालिकेमुळेच निर्माण झाली असून, ही जबाबदारीही पालिकेनेच स्वीकारण्याची गरज आहे. मात्र आज पालिकेतील अनेक कर्णधार अचानक आजारी पडले आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे कचराप्रश्न गंभीर होणार आहे. पावसाळ्यापर्यंत हीच परिस्थिती राहिली तर शहरावर मोठे संकट येईल. मी दररोज कचराप्रश्नाचा आढावा घेतो, मात्र एकही अधिकारी मला स्व:तहून परिस्थितीबाबत सांगत नाही. वर्ग १ चे अधिकारी कुठेही या नियोजनात दिसत नाहीत. आठवडाभरापूर्वी प्रत्येक वार्डांमध्ये कचरा निर्मूलनाविषयी पोस्टर लावण्याचे सांगितले होते, मात्र हे काम कुणीही केले नाही. जेव्हा संकट येतात तेव्हाच चांगले काम होते. आपण शहरात विविध ठिकाणी ४३३ कंपोस्ट पीट तयार करणार असून यातील ७७ कंपोस्ट पीट तयार झाले आहेत. १३३ चे काम सुरू आहे. हे काम तात्पुरते आहे हे डोक्यातून काढून टाका. आपल्याला २५ एप्रिलपर्यंत कंपोस्ट पीट तयार करावेच लागतील. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील. यासाठी जबाबदारी निश्चित करा. सुक्या कचऱ्यामुळे शहराचे सौंदर्य नष्ट होत आहे. एकीकडे पाच हजार कचरावेचक असल्याचे सांगतात. सध्या केवळ १४८ कचरावेचक आहेत, बाकीचे कुठे गेले? सध्या साडेसहाशे मेट्रीक टन मिश्र कचरा रस्त्यावर आहे. शहरात एक, दोन, तीन, सात आणि नऊ क्रमांकांचे झोन गंभीर असून, याकडे विषेश लक्ष द्यावे लागेल,' असे जिल्हाधिकारी म्हणाले.
\Bकचऱ्याचे वर्गीकरण करा; अन्यथा कारवाई
\B'शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक घरातून ओला आणि सुका कचरा करून घ्या. वेगळा कचरा न करणाऱ्या लोकांवरही दंड लावा. हजारो लोकांवर दंड लावला तरी चालेल. शिवाय जे कर्मचारी हे करणार नाहीत त्यांच्यावर थेट कारवाई करा. ज्या झोनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा आहे त्यांनी त्याच झोनमध्ये प्रक्रिया करावी,' असे आदेश डॉ. भापकर यांनी दिले.
\Bप्रश्न चिघळला; अधिकारी सुस्त
\B- कार्यशाळेची कर्मचाऱ्यांना माहिती नाही
- कचरा व्यवस्थापनासाठी ७ जागा निश्चित
- समन्वयासाठी प्रत्येक झोनसाठी विभागप्रमुख
- कचऱ्यासंबंधी नागरिकांकडून माहिती मागवणार
- कचऱ्याचे फोटो काढून माहिती मिळवणार