\Bलसीकरणाअभावी मृत्यूचे तांडव असे\B
………………………- जगभरातील दरवर्षीचे मृत्यू :१५ ते २० लाख (५ वर्षांपर्यंतची मुले)
- भारतातील दरवर्षीचे मृत्यू… : ४ ते ५ लाख (५ वर्षांपर्यंतची मुले)
- लसीकरणापासून वंचित राहणारी जगातील मुले… : १ कोटी ९० लाख मुले
- लसीकरणामुळे मिळणारे संरक्षण : ……२५ आजारांपासून
…
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
राज्यात, देशात लसीकरणाचा शासकीय डंका जोरात पिटला जात असला आणि ठिकठिकाणी लसीकरणाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्या तरी देशातील लसीकरणाचे 'कव्हरेज' हे सरासरी ६० ते ७० टक्क्यांपुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. इतर अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे कव्हरेज बरे म्हणण्याची वेळ येत असली तरी आपल्या राज्यात व विशेषतः ग्रामीण भागात हेच 'कव्हरेज' ५० ते ६० टक्क्यांपुढे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत लसीकरण असते, याचे भान अजूनही नगण्य आहे आणि असे लसीकरण पूर्ण करण्याचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचेही पुरते स्पष्ट झाले आहे.
याच एकंदर स्थितीमुळे आणि लसीकरणाविषयी विकसनशील देशांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूनेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जागतिक लसीकरण सप्ताह पाळला जातो. 'डब्ल्यूएचओ'नुसार अजूनही जगातील १९ दशलक्ष मुले लसीकरणापासून वंचित आहे. २५ गंभीर आजारांपासून संरक्षण मिळत असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्यानंतरही लसीकरणाचे प्रमाण फारसे समाधानकारक नाही. यासंदर्भात शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे म्हणाले, 'खरे म्हणजे लसीकरण हे 'कॉस्ट इफेक्टिव्ह टूल' म्हणजेच फार मोठा आर्थिक भार कमी करणारे महत्त्वाचे आयुध आहे. लसीकरणाचा प्रभावी व परिणामकारक वापर झाला तर जगातील तब्बल १५ ते २० लाख बालकांचा जीव वाचवणे शक्य होऊ शकते. आता तर शासकीय यंत्रणेमध्येही पाच विविध गंभीर आजारांपासून संरक्षण देणार महत्त्वाची लस उपलब्ध झाली आहे, मात्र अजूनही लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहे. त्यातही दहा वर्षांपर्यंत लसीकरण होणे आवश्यक असताना याविषयीची जाणीव व भान फार कमी पालकांना असते. सर्वसाधारणपणे शहरांमध्ये दोन वर्षांपर्यंत लसीकरण केले जाते आणि लसीकरणाचा हळुहळु विसर पडत जातो. पाच वर्षांनंतर तर लसीकरण नसतेच, असा बहुतेकांचा समज आहे. उलट वयाच्या दहाव्या वर्षी ट्रिपल बुस्टर व इतर काही महत्त्वाच्या लसी असतात, ज्या देण्यामुळे संबंधित आजारांपासून आयुष्यभर बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळते, मात्र दहा वर्षांपर्यंत संपूर्ण लसीकरण करणारे पालक फारच कमी असतात. हे लसीकरण पूर्ण होत नाही म्हणूनच मोठ्या मुलांना डांग्या खोकला, गालफुगी, गोवर, कांजण्या यासारख्या आजारांचा फटका बसतो व उपचारांमध्ये मोठा कालावधी व पैसा खर्ची घालावा लागतो, शाळा-अभ्यासही बुडतो. हे ओपीडीवरुन नक्कीच दिसून येते, असेही डॉ. देशपांडे म्हणाले. यकृताचा कर्करोग किंवा यकृत निकामी होण्यामागे कावीळ 'ब' हे एक महत्वाचे कारण आहे; म्हणूनच 'ब'चे लसीकरण प्रौढांमध्ये वाढणे जितके महत्वाचे आहे, तितकेच गर्भवतींसाठीही 'स्वाइन फ्लू'चे लसीकरण वाढण्याची गरज आहे.
\Bमहत्वाच्या लसींचा यंत्रणेत अभाव\B
लसीकरणाअभावी देशातील किमान चार ते पाच लाख बालकांचा दरवर्षी मृत्यू होतो. यामध्ये निमोनिया, डायरिया यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे आणि या आजारांच्या लसीकरणाचा समावेश अजूनही शासकीय लसीकरण कार्यक्रमात झालेला नाही. काही राज्यांच्या शासकीय लसीकरण कार्यक्रमात या लसीकरणाचा समावेश झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये तो झालेला नाही. या लसीकरणाचा समावेश आपल्या राज्यामध्येही व्हायला पाहिजे. त्याचबरोबर दहा वर्षांपर्यंत लसीकरण होणेही तितकेच गरजेचे आहे व याविषयी पुरेशी जनजागृती निर्माण केली पाहिजे, असे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र वैद्य म्हणाले. लसीकरण यंत्रणेमध्ये सर्व प्रकारच्या गुणात्मक सुधारणा होणे हे जास्त महत्वाचे आहे, जेणेकरुन लसीकरणाचे कव्हरेज वाढेल. हे कव्हरेज ९० टक्क्यांपुढे जाणे ही आजची गरज आहे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील लसीकरणाचे 'कव्हरेज' नक्कीच झपाट्याने वाढत असून, ते ८० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. लसीकरणाबाबत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच आघाडीवर आहे, मात्र उसतोड कामगार किंवा भटक्या समाजातील बालकांना किंवा इतर तत्सम बालकांना लस देण्यात अडचणी येतात.
- डॉ. ऋषिकेश खाडीलकर, सहगोयी प्राध्यापक, पीएसएम विभाग, शासकीय कर्करुग्णालय
….....