म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा म्हणजे पोरखेळ झाला आहे. ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये सर्रास कॉप्या केल्या जातात,. त्यामुळेच शहरातील परीक्षा केंद्रावरही असे प्रकार समोर येत आहेत,' असा आरोप प्राचार्यांनीच केला आहे. परीक्षार्थींनी आत्महत्येची धमकी दिल्याच्या घटनांनंतर गुरुवारी झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत 'होम सेंटर' व 'ओपन बुक एक्झाम' या मागणीबद्दल मतभेद समोर आले.
एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्येची धमकी देण्याचे प्रकार घडले. यामुळे प्राचार्य, प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्य संघटनेने गुरुवारी डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनमध्ये तातडीची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच प्राचार्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना उपस्थित प्राचार्यांनी आत्महत्यांच्या धमकीच्या प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षाला कारणीभूत ठरविले. ग्रामीण भागात कॉपी करू दिली जात असल्याने शहरातील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचाही आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या धमक्यांमुळे प्राध्यापकांमध्ये भीती असल्याचे सांगत विद्यापीठाने सरंक्षण देण्याची मागणी डॉ. फारूकी यांनी केली. डॉ. प्रधान म्हणाल्या, अशा प्रकारांबाबत कायदेशीर बाजू तपासून प्राचार्यांनी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केली गेली पाहिजे. डॉ. राव यांनी परीक्षेतील अडचणी मांडत विद्यापीठाच्या चुकांचा फटका बसत असल्याचे सांगितले. 'होम सेंटर'ची मागणी करत डॉ. साळवे यांनी ग्रामीण भागातील मोठ्या कॉपी होत असल्याचे सांगितले. शहरालगतच्या चौका, वाळूज येथील कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर परीक्षांचा बाजार आहे. शहरात कॉपी करू दिली जात नसल्याचे धमकी दिली जाते. हे प्रकार रोखण्याची गरज प्राचार्यांनी व्यक्त केली.
\Bकायद्याच्या नियमावलीत समावेश\B
नवीन विद्यापीठ कायदा आला, परंतु राज्यभरासाठी एकत्रित नियमावली (स्टॅट्यूट) तयार होत आहे. परीक्षार्थींच्या अशा प्रकरणांची दखल घेत प्राचार्य, पर्यवेक्षकांना सरंक्षण देण्याबाबत नियम करता येईल का, याचा विचार केला जात आहे. औरंगाबादमधील घटनांनंतर प्राचार्य महासंघ त्याबाबत प्रयत्न करते आहे, असे सांगण्यात आले. याबाबत प्राचार्यांनी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले.
\Bया प्राचार्यांची उपस्थिती
\B
डॉ. बी. पी. भैरट, डॉ. मझहर फारूकी, डॉ. एस. आर. टकले, डॉ. विजय भोसले, डॉ. वैशाली प्रधान, डॉ. मुक्ती जाधव, डॉ. आर. पी. कासार, डॉ. आर. के. इप्पर, डॉ. सी. एम. राव, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. शेख कबीर, डॉ. एस. डी. राठोड, डॉ. शहाबुद्दीन शेख, डॉ. सतीश सुराणा, डॉ. फातेमा, डॉ. के. एल. साळवे, डॉ. संतोष भोसले, डॉ. एन. जी. पाटील, एस. जी. देशमुख यांची उपस्थिती होती.
\Bप्राचार्यांची समन्वय समिती
\B
प्राचार्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून तिच्यात दहा प्राचार्यांचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आत्महत्येची धमकी देण्याचे प्रकार झाल्यानंतर प्राचार्य, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करू नयेत, यासाठी समिती प्रशासकीय बाजू पाहतील, असे सांगण्यात आले. प्राचार्यांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त, लोकप्रतिनिधींना निवेदन देणार आहेत.
आठवड्यात घडलेल्या दोन प्रकारांमुळे भीती आहे. ग्रामीण भागात तर, कॉपी करू द्या, असा दबाव अनेकदा आमदारांकडूनही येतो. त्यामुळे प्राचार्यांनी काय करावे ? शहरातील या प्रकारांमुळे ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. विद्यापीठाशीही चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
-डॉ. बी. पी. भैरट, प्राचार्य महासंघ