…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मार्चअखेरपर्यंत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणाने धडक मोहीम राबविली. ती यशस्वी करून राज्यात वसुलीत औरंगाबाद विभागाने नववा क्रमांक पटकाविला. ही मोहीम यशस्वी केल्यानंतर एप्रिल महिन्यात महावितरण कार्यालयाच्या अभियंत्यांनी; तसेच कर्मचाऱ्यांनी 'आराम'च केला. त्यामुळे एप्रिल महिन्यात औरंगाबाद विभागाच्या वसुलीत २६ कोटी रुपयांची तूट आल्याचे स्पष्ट झाले आहे. या थकबाकीची वसुली १५ मेपर्यंत न झाल्यास संबंधित उपविभागीय अभियंत्यांच्या पगारातून वीज बिलाच्या थकबाकीची वसुलीची करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली. महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी क्रांतीचौक उपविभागाला मंगळवारी (आठ मे) भेट दिली. त्यावेळी कामकाज संथपणे सुरू असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या विभागातील कामाचा आढावा घेतल्यानंतर क्रांतीचौक उपविभागात २०० वीज मीटर बदलण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. या शिवाय क्रांतीचौकातील वीज वसुलीही खुपच कमी झाली असल्याची माहितीही समोर आली. या प्रकरणावरून मुख्य अभियंता गणेशकर यांनी संबंधित अभियंत्यांना वीज वसुली पूर्ण करण्याचे आदेश दिले. संबंधितांनी कार्यालयात थांबू नये. वीज बिलाच्या वसुलीसाठी बाहेर निघण्याचा सल्लाही दिला. या भेटीनंतर मुख्य अभियंता गणेशकर यांनी 'मटा'ला सांगितले की, औरंगाबाद विभागाची एप्रिल २०१८च्या महिन्यात २६० कोटी रुपयांची डिमांड होती. यातून फक्त २३४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर शहर विभागाला ४२ कोटी रुपयांची वीज देण्यात आली. यातून ३४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. शहरातून आठ कोटी रुपयांची वसुली कमी झालेली आहे. एप्रिल महिन्यात विभागात २६ कोटींची वसुली कमी झाल्याने १५ मेपर्यंत थकबाकी पूर्ण वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ही थकबाकी वसुली झाली नाही, तर संबंधित उपविभागीय अभियंता यांच्या पगारातून थकबाकीची रक्कम वसूल केले जाणार आहे. …………… एक ते पाच मेदरम्यान वीज चोरांवर कारवाई शहर आणि जिल्ह्यात एक ते पाच मेदरम्यान वीज चोरी विरोधात मोहीम राबविण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी दिले होते. ही कारवाई काही भागात राबविण्यात आली, मात्र अनेक भागात ही मोहीम झाली नसल्याची माहितीही महावितरण कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. …………… मीटर बदलण्याच्या मोहिमेतही अपयश एप्रिल २०१८ मध्ये विभागात १६ हजार इलेक्ट्रो मॅग्नेटिक नवीन वीज मीटर लावण्याचे टार्गेट देण्यात आले होते. जुन्या मीटरच्या जागी नवीन वीज मीटर बसविण्यात येणार होते, मात्र एप्रिल महिन्यात फक्त आठ हजार ३०० वीज मीटर बदलण्यात आले आहे. त्यापैकी तीन हजार २०० वीज मीटरची नोंद कम्प्युटरमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वीज मीटर बदलण्याच्या मोहिमेतही महावितरण अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट