म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्याचे मुख्यालय असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी आणि मुख्यालयातील महसूल उपायुक्त पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून या पदांचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर आहे. सध्या महसूल प्रशासनाला बदल्यांचे वेध लागल्यामुळे महिन्याअखेर तरी प्रभारी पदांवर अधिकारी मिळणार काय असा प्रश्न आहे. औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेद्र कटके यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रशांत शेळके यांच्याकडे तर पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार देण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून ही दोन्ही महत्वाची पदे प्रभारींच्या खांद्यावर आहेत. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, फुलंब्री तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्याची धुरा प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मराठवाडा विभागाचे महसूल उपायुक्त हे महत्त्वाचे पदही गेल्या पाच महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर आहे. डिसेंबर महिन्यात प्रल्हाद कचरे सेवानिवृत्त झाल्यानंतर महसूल उपायुक्तचा पदभार शिवानंद टाकसाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या पातळीवरही सध्या बोंडअळी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी तसेच गारपीट अनुदान वाटपासारखे महत्त्वाचे प्रश्न असताना हे पद प्रभारींच्या खांद्यावर आहे. \Bबदल्यांचे वारे \Bमे महिन्याला सुरुवात होताच महसूल विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू होते. मे अखेरीस कार्यकाळ पूर्ण केलेल्या अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून सोयीच्या ठिकाणी बदल्यांसाठी अनेकांनी 'फिल्डिंग'ही लावणे सुरू केले आहे. तीन वर्षे पूर्ण केलेले, होम टाऊन असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती विभागीय आयुक्तालयाने आठही जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. ही माहिती येत्या काही दिवसांत येईल व त्यानंतर बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट