\BNikhil.Nirkhee@timesgroup.com
Tweet-@nnirkheeMT\B
अरुणा शानबाग प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आणि दयामरण-इच्छामरणाचा विषय याच प्रकरणातून उपस्थित झाला. अरुणा यांच्या कोमासदृश मरणासन्न अवस्थेमुळेच त्यांना दयामरण देण्यात यावे, यासाठी जनहित याचिका दाखल झाली होती, तर दयामरणाला केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी कडाडून विरोध केला होता. सुप्रिम कोर्टानेही अरुणा यांचे अधिकृत पालकत्व 'केईएम'कडे दिले होते. तब्बल ४२ वर्षे अरुणा यांची 'केईएम'च्या परिचारिकांनी मनापासून सुश्रुषा करून रुग्णसेवेचा गौरवशाली इतिहास जगापुढे ठेवला. 'अरुणा यांची प्रत्यक्ष रुग्णसेवा केलेल्या 'केईएम'च्या निवृत्त परिसेविका व परिचारिका कल्याणकारी संस्थेच्या सचिव अंजू पराडे व निवृत्त पाठ्यनिर्देशक जयश्री तारकर या शहरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. जागतिक परिचारिका दिन व १८ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या अरुणा यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद
....
\B-अरुणा यांची सुश्रुषा का करावी वाटली ?\B
-कर्नाटकातील अरुणा ही १९६६ मध्ये 'केईएम'मध्ये जेएनएम अभ्यासक्रम करण्यासाठी आली होती व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयातच कनिष्ठ परिचारिका म्हणून रुजू झाली होती. रुग्णालयातील वॉर्ड बॉय सोहनलाल हा रुग्णालयातील 'डॉग लॅब'मधील मांस चोरत होता आणि ही बाब अरुणाच्या लक्षात आली होती आणि तिने सोहनलाल याला हटकले होते. त्या रागातूनच सोहनलाल याने अरुणाचा गळा कुत्र्याच्या साखळीने आवळून तिच्यावर दृष्कृत्य केले होते. गळा आवळल्यामुळे मेंदुला रक्तपुरवठा न झाल्याने तिचा मेंदू निकामी होऊन तिची अवस्था कोमासदृश झाली होती आणि या घटनेचा तिला जबर मानसिक धक्काही बसला होता. घटनेतंतर तिच्यावर 'आयसीयू'मध्ये सर्व उपचार झाले व कुठलीच सुधारणा होत नसल्याने तिला सर्वोदय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र अरुणा ही आमच्यातलीच आहे, तिच्यावर आमच्याच रुग्णालयामध्ये उपचार व्हावेत आणि आम्हीच तिचा सांभाळ करू, अशी भूमिका त्यावेळच्या रुग्णालयातील समस्त परिचारिकांनी घेतला, मोर्चाही काढला. त्याचा केईएम प्रशासनाने विचार करून अरुणाला पुन्हा रुग्णालयात आणले व परिचारिकांच्या निर्णयाला प्रशासनाने शेवटपर्यंत साथ दिली.
\B-४२ वर्षांची ही अखंड रुग्णसेवा प्रत्यक्षात कशी होती? \B
तेव्हापासून (१९७३ पासून) ती अंथरुणाला खिळून होती. मी १९७६ मध्ये रुग्णालयात रुजू झाल्यापासून अरुणाला त्याच अवस्थेत पाहिले व कक्ष क्रमांक ४ मध्ये ती शेवटपर्यंत होती. अरुणाला घटनेचा जबर मानसिक धक्का बसला होता आणि त्यामुळेच पहाटे पाचला तिला जेव्हा आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेले जाई किंवा स्पंजिंग केले जाई तेव्हा ती मोठमोठ्या ओरडत असे आणि 'अरुणा उठली' असे सगळ्या रुग्णालयाला कळून चुकत असे. ती कोणताही स्पर्श किंवा पुरुषी आवाजामुळे भेदरून जात असे, ती त्या घटनेच्या दाहकतेमुळे व तिच्या मनावर खोलपर्यंत झालेल्या जखमांमुळेच. कोमासदृश स्थितीमुळे ती अंथरुणाला खिळलेली होती व तिला जागेवरच चहा, नाष्टा, जेवण भरविण्यात येत होते व ती ते हळूहळू खातही होती, आवडलेले पदार्थ मिळाले तर स्मित हास्यही करत होती. विशेषतः फिशकरी, गोडधोड तिला जास्त आवडत होते. फिशकरी खाताना ती चक्क मिटक्या मारताना दिसायची. फिशकरी आवडते म्हणून मुद्दाम आठवड्यातून एकदा-दोनदा तरी तिला काटे काढून फिशकरी देत असू. तिच्या खोलीमध्ये नेहमी सत्तरीतील गाणी लावली जात असे व ती गाणी एकाग्र चित्ताने ऐकायची, शांत व्हायची, गाण्यांचा आनंद घ्यायची, असे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायचे. विश्वप्रार्थनाही खोलीत लावली जायची. अगदी आपल्या घरातला माणूस असल्यासारखे तिची काळजी घेतली जात होती.
\Bअरुणा यांच्या आहाराची काळजी कशी घेतली ?\B
सगळ्याच नर्स तिच्यासाठी अधून-मधून काहीतरी आणत असत. तिला नष्टा-जेवण भरवण्यासाठी वेळापत्रक तयार केले जाई आणि ज्या नर्सची ड्युटी असेल त्याच नर्सना तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी प्रवेश असायचा. सुरक्षेच्या व इतर कारणांस्तव कुणालाही तिच्या खोलीमध्ये जाता येत नसे. २०११ नंतर अरुणा आणखी क्षीण झाली, तिला चावता येत नव्हते, तोंडावाटे खाणे कठीण होऊ लागले म्हणून नाकात नळी टाकून तिला अन्न दिले जात होते. तरीही आहारतज्ज्ञानुसार तिला पोषक आहार दिला जात होता.
\Bत्यांचे निधन झाल्यानंतर तुमच्या भावना कशा होत्या?\B
२०१३ मध्ये तिला न्युमोनिया झाला होता व आठ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती पूर्वीसारखी झाली होती. मात्र २०१५ मध्ये तिला पुन्हा न्युमोनिया झाला आणि त्यातच ती १८ मे २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला. ती गेल्यानंतरही तिला साडी-चोळी घालून, सजवून परिचारिकांनीच तिला स्मशानात नेले होते. तिरडी पकडायलाही परिचारिकाच होत्या आणि तिची तिरडी तिच्या आवडत्या मोगरा-चाफ्यांनी सुशोभित करण्यात आली होती. मला आठवते त्या दिवशी स्मशानात केवळ 'केईएम'नव्हे तर अनेक रुग्णालयांच्या हजार परिचारिका आल्या होत्या. मी व अधिष्ठाता डॉ. सुपे यांनी तिला भडाग्नी दिला आणि तेव्हाच ४२ वर्षांची रुग्णसेवा थांबली.
\B-अखंड रुग्णसेवेला कोणी कंटाळले नाही का?
\B
-अजिबात नाही. उलट तिची सेवा करण्याची प्रत्येकाची इच्छा असायची. 'अरुणा बायची मला रोज सेवा करू द्या' अशी आमची चंपा मावशी निवृत्त झाल्यानंतर डॉ. सुपे सरांना म्हणत होती. मात्र निवृत्त झाल्यामुळे सुपे सरांनी तिला परवानगी दिली नाही. खरे म्हणजे ती आमचीच होती म्हणून तिला कंटाळायचा प्रश्नच नव्हता. तिच्या सेवेसाठीच रुग्णालयातील डॉ. सिक्वेरा यांनी ५० हजारांची मदत केली होती. इतर सर्वजण आपापल्या परीने मदत करीत होते. अरुणाच्या सेवेत प्रशासनानेही कधीच हात आखडता घेतला नाही, हेही आवर्जून सांगावे लागेल. अरुणाची व तिच्या प्रामाणिक सेवेची आठवण म्हणूनच १८ मे पासून आठवडाभर आम्ही 'नर्सिंग केअर विक' साजरा करतो.
\B-दयामरणाला विरोध करण्यामागे कोणती भूमिका होती?
\B
-पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिले व २०११ मध्ये तिच्या दयामरणासाठी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र मुळात तिला दयामरण द्यायचे कशासाठी, हा आमचा प्रश्न होता. ती अन्न स्वीकारते, कमी का असेना प्रतिसाद देते, अनेक सूचना ऐकते, असे असताना तिला दयामरण देणे आम्हाला अजिबात मान्य नव्हते. आम्ही सर्व कष्ट उपसून तिचा सांभाळ करीत असताना तिच्या दयामरणाची मागणी करणाऱ्या विराणी यांनी पुस्तकाच्या कॉपीराइटची साधी रॉयल्टीदेखील दिली नाही. त्यामुळे विराणी यांना दयामरणाची मागणी करण्याचा कोणताही अधिकार नव्हता, हीच आमची भूमिका होती. नंतर सुप्रिम कोर्टानेही याचिका फेटाळली आणि पालकत्व 'केईएम'कडे दिले आणि आम्ही तिचे पालकत्वही समर्थपणे निभावले. याची नोंद केवळ देशाने नव्हे तर जगानेही घेतली.