म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -
आपले अपयश लपवण्यासाठी पोलिस शिवसेनेला बदनाम करीत आहेत. दंगलीत ज्या पोलिसांना आम्ही वाचवले तेच पोलिस आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी केला. तापडिया नाट्य मंदिरात आयोजित शिवसेनेच्या शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
चंद्रकांत खैरे म्हणाले, 'अचानक दंगल कशी सुरू झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर दगडफेक कशी आणि कुठून झाली, पेट्रोल बाँब कुणी फेकले याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. यात पोलिसांना अपयश येत आहे. राजेंद्र जंजाळ यांनी प्रतिकार केला नसता तर चार जणांचे जीव गेले असते.' विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. त्यावर खैरे म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्या मागे उभे रहायचे नाही, त्यांचे संरक्षण करायचे नाही तर कुणाचे संरक्षण करायचे.' विखे पाटील दलबदलू आहेत, ते मुख्यमंत्र्यांना मिळालेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आपण बचाव केला आहे, संरक्षण केले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असे असले तरी तुम्ही सतर्क रहा, कधीही काहीही घडू शकते, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. औरंगाबादच्या विधानसभेच्या तिन्हीही जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या मेळाव्यात व्यासपीठावर संपर्क नेते विनोद घोसाळकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार अण्णासाहेब माने, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, विजय वाघचौरे, विधानसभा संघटक रेणुकादास (राजू) वैद्य, महिला आघाडीच्या कला ओझा, रंजना कुलकर्णी, सुनीला आउलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजी-माजी पदाधिकाऱ्यांना डावलू नका
विनोद घोसाळकर यांनी शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख यांच्या जबाबदाऱ्या, कामाची माहिती दिली. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीला आजी-माजी पदाधिकाऱ्यांना बोलवत जा, त्यांना डावलू नका असे त्यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना सांगितले. आमदार संजय शिरसाट, नरेंद्र त्रिवेदी, अण्णासाहेब माने यांचेही यावेळी भाषण झाले.
मी थोडे मोठ्याने बोललो की,
खैरे रागावले असे म्हणतात
संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एवढे बोलतात पण त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही आणि मी थोडे मोठ्याने बोललो की खैरे रागावले असे म्हटले जाते, असा उल्लेख करून कार्यकर्त्यांना उद्देशून खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मी तुमचा मोठा भाऊ आहे. कुटुंबप्रमुख आहे. मी जेवढा रागावतो तेवढेच प्रेमही करतो.