म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महानगरपालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना पहिल्याच दिवशी नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. कचराकोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी नियोजन केले होते. मात्र, हर्सूल व चिकलठाणा येथे कचरा टाकण्यास रहिवाशांनी विरोध करीत कचऱ्याची वाहने परत पाठवली. रहिवाशांची समजूत घालण्याचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले.
औरंगाबाद शहरातील कचऱ्याची समस्या राज्यभर चर्चेचा विषय झाली आहे. काही दिवस महापालिका आयुक्त नसल्यामुळे ही समस्या प्रचंड वाढली होती. नुकताच पदभार स्वीकारलेले आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (१८ मे) कचरा निर्मूलन मोहीम हाती घेतली. प्रत्यक्षात ठिकठिकाणी रहिवाशांचा टोकाचा विरोध झाल्याने आयुक्तांना हात हलवत परतावे लागले. चिकलठाणा येथील रहिवाशांनी तर कचऱ्याच्या वाहनांसह परत पाठवले. हर्सूल गावात विरोध कमी झाल्यानंतर कचरा टाकण्यात आला. दिवसभर उचलेला कचरा कांचनवाडी, पडेगाव परिसरात टाकण्यात येत होता. ओला आणि सुका, असे कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे शहरातील कचरा समस्येची तीव्रता कमी झाली आहे. काही भागात अजूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे कचराकोंडी दिसत आहे. राज्यभर टीकेची झोड उठल्यामुळे मनपाची यंत्रणा अडचणीत सापडली आहे. आयुक्त नसल्यामुळे कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. नियमित आयुक्त म्हणून डॉ. निपूण विनायक रुजू झाले आहेत. आयुक्त विनायक यांच्या आदेशानुसार शुक्रवारी कचरा उचलण्यास सुरुवात झाली. सकाळी चिकलठाण्यात कचऱ्याने भरलेली १५ वाहने रिकामी करण्यात आली. कचरा टाकण्यास रहिवाशांनी टोकाचा विरोध केला. या विरोधामुळे कचरा टाकणे बंद करण्यात आले. अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतरही रहिवाशांचा विरोध कमी झाला नाही. आयुक्त विनायक यांनी स्वत: समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुविधा दिल्याशिवाय काम करू देणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. त्यानुसार कचरा टाकण्याचे काम बंद करण्यात आले. नागरिकांच्या सूचनेप्रमाणे काम करून कचरा टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मजबुतीकरण करून पूर्ण प्रकल्पाला झाकून घ्या. आसपासच्या विहिरीत कचऱ्याचे मिसळलेले पाणी येणार नाही याची दक्षता घ्या. नियोजन करूनच कचरा टाका, असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
\Bनागरिकांचा तीव्र विरोध\B
महापालिकेच्या पथकाला कचरा टाकताना चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथे विरोध करण्यात आला. हा विरोध दुपारी कमी झाल्यानंतर कचरा टाकण्याचे काम सुरू झाले. फक्त चिकलठाणा येथे कचरा टाकण्यात आला नाही. संनियंत्रण समितीमार्फत दिवसभरात हर्सूल येथे ७२ टन, चिकलठाणा येथे ४० टन, पडेगाव येथे २०० टन आणि कांचनवाडी येथे ४८ टन कचरा टाकण्यात आला. तसेच वॉर्ड क्रमांक सात व आठ येथून साचलेला संपूर्ण कचरा उचलण्यात आला.
\Bमहापौरांची लगबग\B
कचराकोंडी कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांची लगबग कायम आहे. पक्षादेश आणि लोकांचा रोष अशा कात्रीत महापौर सापडले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कचरा उचलून घेण्यासाठी त्यांनी नियोजन केले होते. मागील पंधरा दिवस काम थांबवले होते. मात्र, नवीन आयुक्त आल्यानंतर महापौरांनी पुन्हा काम सुरू केले. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कचरा भरून घेतला. औरंगपुरा, पैठणगेट, गुलमंडी, किलेअर्क या भागात स्वच्छता करण्यात आली.