म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातत्याने हिमोग्लोबिन कमी होत होते; परंतु त्यामागचे कारण कळत नव्हते. चाचणीनंतरच मूत्रपिंड निकामी झाल्याचे विसाव्या वर्षी लक्षात आले. आईने मूत्रपिंडदान केले आणि प्रत्यारोपणानंतर या तरुणीने उत्तम गुण मिळवत पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षण घेताना सर्व परिस्थिती माहीत असताना एका उमद्या तरुणाने लग्नाची मागणी घातली आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतलेली तरुणी रेशीम बंधनात अडकली. दोघांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण पोटात मूल वाढत असल्याचे लक्षात येताच काही झाले तरी बाळाला जन्म द्यायचा धाडसी निर्णय घेतला. दोघांच्या धीरोदात्त प्रेमाने समाजापुढे वस्तुपाठ घालून दिला आहे.
ही तरुणी म्हणजे अवंती प्रवीण लव्हेकर. किनवट येथील अवंतीची यांची आई वंदना या शिक्षिका, तर वडील अविनाश दुर्गपुरोहित हे शिक्षक पतसंस्थेत कर्मचारी आहेत. अवंती या लहानपणापासून चुणचुणीत, मनमिळावू होत्या. नेहमीच उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या अवंती यांना रक्तातील लोहाचे प्रमाण घटण्याचा म्हणजेच अॅनेमियाचा त्रास होता. 'बीसीएस'च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांना कमालीचा थकवा जाणवू लागला. हात-पाय-अंगदुखीने त्या कासावीस होत असत. त्यावेळी त्यांचे हिमोग्गलोबिन ३.५ पर्यंत खाली गेले होते. पुढील उपचार-सल्ल्यासाठी औरंगाबाद येथील ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर यांच्याकडे पाठवण्यात आले असता दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याचे लक्षात आले. हा कुटुंबियांना मोठा धक्काच होता. त्यांचे डायलिसिस सुरू झाले. डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा पर्याय समोर ठेवताच कुटुंबातील अनेकजण मूत्रपिंडदानासाठी पुढे आले. अवंती यांच्या आईचे मूत्रपिंड वैद्यकीयदृष्ट्या जुळले व प्रत्यारोपणासाठी सर्वोत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईनेच किडनीदानाचा निर्णय घेतला. २५ जुलै २०११ मध्ये कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे प्रत्यारोपणानंतर अवघ्या पाचव्या महिन्यांत त्यांनी 'बीसीएस' प्रथम वर्षाची परीक्षा जिद्दीने दिली. त्यांनी ७० टक्के गुण मिळवत पदवी घेतली. २०१४ मध्ये 'एमएससी'ला प्रवेश घेतला. या दरम्यान त्यांच्या परिचयातील नांदेड येथील प्रवीण लव्हेकर यांनी लग्नाची मागणी घातली. प्रत्यारोपणानंतर लग्न न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतलेल्या अवंती व तिच्या कुटुंबीयांनी प्रवीणला सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली, तरी प्रवीणने तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेत तिला प्रेमाची साद घातली. अवंती यांनी प्रेमाला प्रतिसाद दिला आणि दोघांचे २०१४ मध्ये सर्वांच्या संमतीने लग्न झाले.
....
\Bदोघे आनंदी-समाधानी\B
प्रत्यारोपण व त्या अनुषंगाने येणाऱ्या गुंतगुंतीमुळे दोघांनी दत्तक मूल घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गर्भात मुल वाढत असल्याचे लक्षात आले तेव्हा अवंती यांनी काहीही झाले तरी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. अर्थात, डॉ. बावीकर यांची संमती व भक्कम पाठिंबा दिल्यामुळे अवंती यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर डॉ. हेगडेवार रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्त्र डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर यांच्याकडे उपचार सुरू झाले. पाचव्या महिन्यापासून अवंती या कुटुंबासह औरंगाबाद येथेच राहण्यासाठी आले. कुठलीही गुंतागुंत न होता त्यांनी २०१७ मध्ये संपूर्ण नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण करून अडीच किलोंच्या सशक्त बाळाला जन्म दिला. हाच अर्णव आज दहा महिन्यांचा झाला असून अवंती वप्रवीण समाधानी आहेत.
....
मी रडत बसण्यापेक्षा प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर सकारात्मक पद्धतीने विचार केला. लवकरच 'एमएसस्सी' पूर्ण करेन. स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करुन दाखवायचे आहे.
- अवंती लव्हेकर, प्रत्यारोपित रुग्ण
...
मला अवंती आवडली होती आणि काही झाले तरी तिच्याशीच लग्न करण्याचा मी निर्णय घेतला होता. अवंतीने होकार दिला आणि घरच्यांनीही साथ दिली, हे महत्वाचे.
- प्रवीण लव्हेकर, अवंती यांचे पती
....
अवंतीला खूप वर्षांपासून अॅनेमिया होता. मात्र 'किडनी फंक्शन टेस्ट' न करता इतर सर्व उपचार करण्यात येत होते. यावरून 'केएफटी'चे महत्त्व अधोरेखित होते.
- डॉ. सुहास बावीकर, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ
...
अशा केसेसमध्ये नैसर्गिक प्रसुती धोक्याची ठरू शकते. त्यामुळे सिझेरियनचा निर्णय घेण्यात आला. अशी ही केस आमच्या रुग्णालयातील पहिली केस आहे.
- डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. हेडगेवार रुग्णालय
...