पान पाच मेनलीड बातमी
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून २०१७ रोजी संपकरी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून काही गोष्टींचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्याप पाळले गेले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन संप स्थगित केला. फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ रविवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही, दूध दरवाढ झालेली नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. वर्ष उलटून गेले तरी एकाही गोष्टीची पूर्तता झाली नाही, याविरोधात क्रांतीचौकात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विश्वासघातकी, लबाड, खुनी सरकारचा निषेध असो, काळा पैसा कोठे गेला?, सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?, दीड पट हमीभाव देण्याचे काय झाले?, १५ लाख रुपये कोणाच्या खात्यात जमा केले? आदी प्रश्न उपस्थित केले गेले. दंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला. विश्वासघात आंदोलनात अन्नदाता शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मनसे, मावळा मराठा, बुलंद छावा, शेकाप, तेली युवा संघटना, बळीराजा शेतकरी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारने दहा जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारच्या विरोधी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले. यावेळी जयाजी सूर्यवंशी, बाबुराव केकते, सुधाकर गाडेकर, शेख रफिक शेख हुसेन, संतोष गाडेकर, उद्धव तांबे, पुंजाराम तांबे, सुदाम तांबे, सुरेश वाकडे, सतीश वेताळ,भरत कदम, राजीव खिल्लारे, हरिदास घोले, बळीराम चांगतपुरे, महेश गुप्ता, अशोक कुऱ्हे, सुनील तांबे, विजय काकडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथे शेतकरी विश्वासघात दिन पाळण्यात आला. किसान क्रांतीने पुकारलेल्या संपानंतर सरकारसमोर काही मागण्या केल्या होत्या. एक ऑक्टोबर २०१७ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती, पण सरकारने विश्वासघात केला. त्याच्या निषेधार्थ रविवारी लासूर स्टेशन बसस्थानक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शेतकऱ्यांतर्फे निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांनी दूध सांडून सरकारला निषेध केला. यावेळी बापूसाहेब सातपुते, सतीश अभंग, दशरथ जाधव, विलास पवार, विलास गवळी, रामहरी शेजवळ, गजानंद देवकाते, श्रीकांतशेजवळ, विजय भाले, भाऊसाहेब गवरे, संतोष तायडे आदी उपस्थित होते.
शेतकरी संपाची तिव्रता टप्प्याटप्प्याने वाढवणार
संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला देशव्यापी संप टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र केला जाणार आहे, असा इशारा किसान क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक सदस्य महेश गुजर यांनी दिला.
कोअर कमिटी बैठक रविवारी झाली. विजय काकडे, जयाजी सूर्यवंशी,अण्णासाहेब जाधव, राजीव खिल्लारे, महेश गुजर, जरांगे पाटील आदी उपस्थित होते. सोमवारी चार जून रोजी सकाळी दहा वाजता जुने कायगाव, नगर महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे.
सात व आठ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आंदोलन असेल. १० जून रोजी भारत बंद पुकारण्यात आला असून संप काळातील लढ्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अण्णासाहेब जाधव, जितेंद्र सिरसाट, योगेश शेळके, भाऊसाहेब शेळके, संपत रोडगे, राजीव खिल्लारे, देविदास पाठे, संकेत मैराळ, बापूसाहेब सातपुते, महेश गुजर यांनी केले आहे.