म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
'बारा महिने झोपतात आणि पावसाळ्यामध्ये काम करायला येतात. लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. लाखो रुपयांचं नुकसान होतं, राशन भिजून जाते,' अशा शब्दात नागरिकांनी रविवारी महापौरांना सुनावले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जयभवानीनगरमधील नागरिकांचे पावसाने अतोनात हाल झाल्याने महापौरांनी रविवारी नालेसफाईचा दौरा केला. त्यावेळी त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.
पाऊस सुरू होताच शहरातील नाल्यांच्या सफाईला सुरुवात झाली असून त्याची पाहणी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी विविध भागात दौरा केला. पद्मपुरा, किलेअर्क, औषधी भवन येथील नालेसफाईची पाहणी करून ते गजानन महाराज मंदिर चौकात पोहचले. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ते जयभवानीनगर चौकात पोहचताच नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. जयभवानीनगरच्या गल्ली नंबर ९, १०, ११ मध्ये पोहचताच महापौरांना नागरिकांनी घेराव घालत तक्रारी मांडल्या. गल्ली क्रमांक ९ मध्ये नाल्याची पाहणी करताना त्यांना पुरूष व महिलांनी आम्ही रात्रभर गुडघाभर पाण्यातून ये-जा केले, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे, असे सांगितले. गल्ली क्रमांक १०मध्ये पाहणी करताना, एक दिवस घरातच काढला; आता किती दिवस घरातच बसून काढणार, काही तरी करा, असे एका नागरिकांना सुनावले. तेवढ्यात एका नागरिकाने महापौरांना सर्वांसमोर फैलावरच घेतले. 'बारा महिने झोपतात आणि पावसाळ्यात काम करतात. घरामध्ये पाणी जाते, लाखो रुपयाचं नुकसान होतं. रॉकेल, रेशन सर्व भिजत आहे,' या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे रागावलेल्या महापौरांनी त्यांना, 'खाली हात करून बोला, जरा कोणाशी बोलता हे बघा,' असे सुनावले. त्यानंतर गल्ली नंबर ११मधील महिलांनी त्यांना नाल्यातून जावे लागते तुम्ही सांगा कसे जायचे ते, असा प्रश्न केला. 'नाला खोदल्यापासून अवस्था वाईट झाली आहे. पुलाचे काम सुरूच आहे. परेशानी आहे, बप्पा सारी,' असे महिला म्हणाल्या. ' साहेब आधी काम पूर्ण करा, सहा माणसांत कशी कामे पूर्ण होतील,' असा प्रश्न त्यांना नागरिकांनी केला.
\Bरात्रन् दिवस काम करण्याचे आदेश \B
नागरिकांचा प्रश्नांचा भडीमार झाल्याने निरुत्तर झालेल्या महापौर घोडेले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रात्रन् दिवस कामे करा, अशा सूचना दिल्या. महापौरांच्या पाहणी दरम्यान नगरसेविका मनीषा मुंडे मात्र गैरहजर होत्या.