म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
गेल्या आठवड्याभरापासून मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार कृपादृष्टी केली आहे. बुधवारी बरसलेल्या पावसाचे सत्र गुरुवारीही सुरुच होते, शुक्रवारी (८ जून) सकाळपर्यंत लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तिन्ही जिल्ह्यातील तब्बल ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.
जून महिन्याच्या प्रारंभीपासून औरंगाबाद वगळता इतर सातही जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी झालेल्या पावसाने गुरुवारीही हजेरी कायम ठेवत लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याला धुवून काढले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा, बिलोली, लोहगाव व धर्माबाद, लातूर जिल्ह्यातील औसा, लामजना, किल्लारी, मातोळा, भादा, किनीथोट, बेलकुंड, मोघा, हेर, दवर्जन, वाढवण बु., नागलगाव, शेळगाव, निलंगा, अंबुलगाव, मदनसुरी, कासारबा, लकंदा, निटूर, पानचिंचोली, बोरोळ, शिरुर अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी, तुळजापूर, सावरगाव, नळदुर्ग, सालगरा, उमरगा, मुरुम, नागरवाडी, मुळज, डाळीव, लोहारा व जेवळी महसूली मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मराठवााड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीही सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात ५.५५ मिलिमीटर, हिंगोली १२.१४, नांदेड २५.१०, बीड १.८४ , लातूर ५५.५१ तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ३७.८८ मिलिमीटर पाऊस झाला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याांमध्ये किरकोळ पाऊस झाला.
उमरगा तालुक्यात २८.४ टक्के पाऊस
मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसातच उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल २८.४ टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनचे आणखी चार महिने शिल्लक असल्याने पावसाचा असाच वेग राहिला तर उमरगा तालुका लवकरच सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना, परभणी कोरडे
आठवड्याभरात एकीकडे निम्म्या मराठवाड्याला पावसाने धुवून काढले असताना औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यात मात्र अत्यंत किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात केवळ १० मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात ३ मिलिमीटर असा किरकोळ पाऊस झाला. जालना जिल्ह्यात मात्र दोन्ही दिवस पाऊस झाला नाही.