वेतन वाढीच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून विभागात शनिवारी ८०२ फेऱ्यांपैकी जवळपास ७७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे ५७ लाखांचा महसूल बुडाला. नव्वद टक्के कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.
औरंगाबाद विभागात मध्यवर्ती बसस्थानक, सिडको, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव येथील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. शनिवारी सकाळच्या सत्रात काही बस आगाराबाहेर पडल्या. या बस गेल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन अन्य कर्मचाऱ्यांना केल्यानंतर ते ही संपात सहभागी झाले. यानंतर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले. काही अज्ञात व्यक्तींनी एसटीच्या चाकातील हवा सोडली. एसटी महामंडळाच्या कराराच्या नियमांचा विरोध करण्यासाठी बस स्थानकाबाहेर अनेक कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. औरंगाबाद बसस्थानकाहून निघालेल्या औरंगाबाद सुरत या बसच्या काचा कन्नडजवळ तर औरंगाबाद वाशिम बसच्या काचा आंदोलकांनी केंब्रीज स्कूलजवळ फोडल्या. त्यावेळी प्रवासी भयभित झाले होते.
कारवाईची भीती नाही
आंदोलनाबाबत एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, 'रावतेंनी चांगले वेतन देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी केलेला वेतन करार हा भ्रमनिराश करणारा आहे. शिवाय वेतन करार नाकारणाऱ्यांना कॅमेऱ्यात लिहून देण्याचे, राजीनामा देण्याची प्रशासनाची भाषा चुकीची आहे. वेतन सन्मानजनक करावे एवढीच आधीपासून मागणी आहे. संपात सहभागी झाल्यामुळे आम्हाला कारवाईची भीती नाही.'
विशेष रेल्वे सोडली
एसटीच्या संपामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने नांदेड ते औरंगाबाद विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. दहा जून रोजी ही रेल्वे नांदेडहून ११.२० वाजून मिनिटांनी सुटणार आहे. औरंगाबादला ही रेल्वे ४.३० वाजता पोहोचणार आहे. औरंगाबादहून ही पॅसेंजर ५.१५ वाजता सुटेल. ती रात्री दहा वाजता नांदेडला पोहोचेल. ही रेल्वे पूर्णा, परभणी, मानवत, सेलू, परतूर, जालना आणि बदनापूरसह मुंकुंदवाडी येथे थांबणार आहे.
संप कशासाठी आहे हे माहित नाही, पण कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यास ते कशाला आंदोलन करतील. खासगी गाड्यांमधून प्रवास करण्याचा माझा या पूर्वीचा अनुभव वाईट आहे. त्यांनी प्रवाशांना अक्षरश:लुटले. आता पुण्याला जाण्यासाठी कसे जावे? हा प्रश्न आहे. खासगी गाड्याने प्रवास केल्यास अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील.
- किशोर कुलकर्णी, प्रवासी
आम्हाला जळगावला जायचे आहे. आता बाहेरून खासगी गाड्यांनी जा, असे सांगण्यात येत आहे. खासगी वाहनाचालकांनी अव्वाच्यासव्वा तिकीट दर घेऊन नुसती लूट सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटविल्यास आमच्या सारख्या नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील.
- सुकलाल बोंदरनेगे, प्रवासी
बुलडाण्याला आम्हाला जायचे आहे. बसस्थानकावर आल्यानंतर आम्हाला स्थानकाबाहेर जा असे सांगण्यात येत आहे. स्थानकावरून परिवहन विभागाचे अधिकारी प्रवाशांना हाकलून लावत आहे. हे चुकीचे आहे. ज्या काही मागण्या असतील त्याबाबत तुम्ही निर्णय घ्या, पण प्रवाशांना हकलण्याची पद्धत चुकीची आहे.
- मनोहर शिरसोले, प्रवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट