म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जयभवानीनगरातील नाला कागदावर अस्तित्वात नाही, मग तेथील घरे पाडणार कशी असा अजब खुलासा महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी केला. या खुलाशामुळे नगरसेवक अवाक झाले. महापौरांनी या प्रकरणात आयुक्तांना कारवाई करण्यास सांगितले, आयुक्तांनी स्वत: लक्ष घालण्याचे मान्य केले. जयभवानीनगरातील नाल्यावर पाण्याचा प्रवाह आडविणारी दोन बांधकामे उभीच आहेत. वारंवार मागणी करूनही ती बांधकामे पाडण्यात येत नाहीत. त्यामुळे हीच मागणी त्या भागातील नगरसेविका मनिषा मुंडे यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत पुन्हा केली. बांधकामे पाडून नाला मोकळा केला नाही तर पावसाळ्यात मोठा त्रास होईल, असे त्या म्हणाल्या. मुंडे यांना प्रमोद राठोड व भगवान घडमोडे यांनी पाठिंबा दिला. महापौर नंदकुमार घोडेले यांनी याबद्दल शहर अभियंता सखाराम पानझडे यांना खुलासा करण्यास सांगितले. पानझडे म्हणाले, 'जयभवानीनगरातील नाला कागदावर अस्तित्वातच नाही. नाल्याचा नकाशा नाही, त्यामुळे घरे कशी पाडायची हा प्रश्नच आहे.' यावर प्रमोद राठोड म्हणाले, 'पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पाहून कारवाई करा. त्या बांधकामांबद्दल काही तरी निर्णय घ्या. बांधकामे न पाडण्यात अधिकाऱ्यांचा काही तरी इंटरेस्ट दिसतो असा आरोप त्यांनी केला. ती दोन बांधकामे पाडली नाहीत तर पावसाळ्यात जयभवानीनगरात शेकडो जीव जातील, असा इशारा त्यांनी केला. महापौर अधिकाऱ्यांना आदेश देताना म्हणाले, 'पाण्याचा नैसर्गिक प्रवाह लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तात बांधकामे पाडण्याची कारवाई करा. यासाठी त्यांनी पाच अधिकाऱ्यांच्या समितीची घोषणा केली. त्यात शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, अफसर सिद्दिकी, अतिक्रमण हटाव विभागाचे सी. एम. अभंग, नगररचना विभागाचे डी. पी. कुलकर्णी यांचा समावेश करण्यात आला. आयुक्तांनी स्वत: या कारवाईत लक्ष घालावे, असे ते म्हणाले. आयुक्त डॉ. निपुण विनायक म्हणाले, मला काही तासांचा वेळ द्या. या कामासाठी मी एक अधिकारी नियुक्त करतो, त्याला पूर्ण अधिकार देखील देतो. पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तांशी देखील बोलतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट