म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील वारसास्थळे, क्रीडा, आरोग्य आणि शाळांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले. या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी १३३ कोटींची तरतूद करण्याची मागणी केली. आयुक्तांनी महापौरांना अशा प्रकारचे पत्र देण्याची ही पहिलीच घटना आहे. महापौरांना दिलेल्या पत्रात डॉ. विनायक यांनी म्हटले आहे की, 'औरंगाबाद हे शहर ऐतिहासिक शहर आहे. शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी अर्थसंकल्पात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. शहरातील उद्यानांचा विकास आणि क्रीडा क्षेत्रात विविध दर्जेदार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा वाव आहे. महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये एका वर्षात किमान दोन उद्याने विकसीत केली तर पुढील काही वर्षात शहरात वेगळेपण दिसून येईल. क्रीडांगणे तयार करणे देखील गरजेचे आहे. क्रीडाक्षेत्रासाठी २० कोटी रुपये तर उद्यानांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करा, अशी मागणीही आयुक्तांनी केली आहे. शाळा आणि आरोग्य सुविधांसाठी दहा कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी रुपयांची, पाणीपुरवठा योजनेत काही तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या कामात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी करावयाच्या कामांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे, प्राणी कल्याण योजनेसाठी देखील दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी आयुक्तांनी महापौरांकडे केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्प मंजूर करताना आयुक्तांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व अर्थसंकल्पातही त्यानुसार तरतूद केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट