म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पर्यटनवाढीसाठी सारनाथ, बोधगया येथे तीन ते पाच दिवस होणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येते. पाच दिवस होणाऱ्या या कॉनक्लेव्हचा कार्यक्रम एक दिवस वेरुळ-अजिंठा येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन विभागाचे सहसचिव सुमल बिल्ला यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.
जगप्रसिद्ध अजिंठा, एलोरा लेण्यांना भेट देण्यासाठी जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, तसेच त्या दूर करण्यासाठी काय पावले उचचली पाहिजेत, यावर दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत पर्यटनाच्या विविध विषयांवर ऊहापोह झाला. या कार्यशाळेला केंद्रातील पर्यटन, पुरातत्व विभागाचे सहसचिव, जपान सरकारचे मंत्री, अधिकारी, एमटीडीसीचे अधिकारी तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. दिल्लीस्थित जपानच्या दुतावासातील मंत्र्यांनी, व केंद्रातील पुरातत्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शवल्याने येत्या काही महिन्यात अजिंठा तसेच वेरुळ येथे मोठे बदल दिसून येतील, अशी अपेक्षा चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
बोधगया येथे होत असलेल्या इंटरनॅशन बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हमध्ये जगभरातील टूर ऑपरेटर तसेच पर्यटक हजेरी लावत असतात, वेरुळ अजिंठा येथे कॉन्क्लेव्हचा एक दिवस देण्याच्या निर्णय पर्यटनवाढीसाठी सकारात्मक ठरणार आहे. या कॉनक्लेव्हचा एक दिवस औरंगाबादला देण्यात यावा या विषयीचा प्रस्ताव यापूर्वीच एमटीडीसीने पाठवला होता. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही कॉनक्लेव्हसाठी किमान एक दिवस मिळावा, अशी मागणी यावेळी केली. अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या सोई असाव्यात याचा आढावा घेण्यासाठी दिल्ली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेमध्ये पर्यटन समस्येवर गांभिर्याने चर्चा झाली. स्थानिक पातळीवर प्रशासनाने करावयााच्या विविध कामांमध्ये सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी चौधरी यांनी दिले.
दिल्लीवरून औरंगाबादला थेट विमानाची सोय नसल्याने अडचण होत असल्याचे मत जपान दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये एमटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी प्रेझेंटेशन केले.
बुद्धिस्ट सर्किटला तत्वत: मान्यता
केवळ उत्तर भारत आणि बिहारचा दबदबा असलेल्या बुद्धिस्ट सर्किटमध्ये आता अजिंठा आणि वेरुळचाही समावेश करण्यात आला असून याला तत्वत: मान्यता देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार ही तीन राज्ये बुद्धिस्ट सर्किटद्वारे जोडली गेलेली आहेत. औरंगाबाद बुद्धिस्ट सर्किटला जोडण्यात आल्याचे केवळ चर्चा होती. आता तत्वत: मान्यता मिळाल्याने आता उत्तरप्रदेश, बिहार तसेच मध्यप्रदेश सोबतच अजिंठा-वेरुळमुळे महाराष्ट्राचेही नाव जोडले गेले आहे.