म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सामान्य लोकांना न्याय मिळत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आहेत. जेथे लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही, तेथे पंतप्रधान लोकांना योग करा, असे म्हणतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. मतांचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांशी आघाडीचा विचार सुरू असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेसच्या बूथ कमिटी समन्वयकांची बैठक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुरुवारी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समन्वयक माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, भीमराव डोंगरे, जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, नितीन पाटील, सुरेखा पानघडे, विलास औताडे उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाजपवर तोफ डागली. वाकडी येथील अत्याचार प्रकरण गंभीर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांची दखल घेताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बाल हक्क संरक्षण आयोगमार्फत नोटीस बजावली. नागरिकांचे या प्रकरणावरून अन्यत्र लक्ष जावे, हाच भाजपचा डाव आहे, असे त्यांनी नमूद केले.
राज्यात १५ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कर्जमाफीचा प्रश्न कायम आहे. हरभरा, तूर खरेदी होत नाही. नीरव मोदी, विजय माल्यासारखे उद्योगपती कोट्यवधींचे कर्ज घेऊन विदेशात पळून गेले, मात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, असा आरोपही प्रदेशाध्यक्षांनी केला.
बूथ कमिटी सक्षम करा
आगामी निवडणुकीत आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), भाजप, शिवसेनेसारख्या शत्रूंशी लढा द्यावा लागणार आहे. 'आरएसएस' गावागावात कर्करोगाप्रमाणे पसरत आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी,'भाजप, संघाला रोखण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. यंत्रणा सक्षम असलेल्या ठिकाणी आपले उमेदवार विजयी होतील. त्यासाठी बूथ कमिटी अधिक सक्षम करा. याद्या घरात बसून करू नका, अन्यथा निवडणुका देवाच्या भरवशावर लढवाव्या लागतील,' असेही नमूद केले.