म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद विजेच्या खांबात वीज प्रवार उतरल्यामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत जमावाने महावितरणच्या कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण केली; तसेच चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कार्यालयाची नासधूस केली. हा प्रकार रविवारी दुपारी तीन ते रात्री ११च्यादरम्यान घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत तुळशीराम फकिरा सपकाळ (वय २५, रा. मयूरपार्क) यानी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये सपकाळ रविवारी कार्यालयात कर्तव्य बजावत होते. यावेळी नारेगाव येथे विजेच्या खांबात वीज प्रवार उतरल्याने गायीचा मृत्यू झाला असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. हा फोन आल्यानंतर सपकाळ व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी तेथे असलेल्या प्रमोद वाळेकर, गणेश गायकवाड व दोन आरोपी (सर्व रा. नारेगाव) यांनी सपकाळ यांना शिवीगाळ करीत रॉडने मारहाण केली. डाव्या कोपऱ्यावर मार लागल्याने सपकाळ जायबंदी झाले. त्यांच्या तक्रारीवरून संशयित चार आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुसरी तक्रार महावितरणचे इशान नंदकिशोर उबाळे (वय ३०, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड) यांनी दिली. उबाळे हे रविवारी रात्री साडेआठ वाजता महावितरणच्या कार्यालयात कर्तव्य बजावत होते. यावेळी जमावाने त्यांच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश केला. खांबात वीज प्रवाह उतरल्याने गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या रागातून त्यांनी कार्यालयातील टेबल, खुर्च्या, खिडक्यांच्या काचा, टेलिफोन; तसेच बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. महावितरणने पथदिव्यांचे तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडणी केली. याप्रकरणी उबाळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट