म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध सुविधा देऊन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सेवा देण्याचे काम झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटुंब समाधानी असेल, तर पोलिस कर्मचारी अधिक चांगल्या सेवा देऊ शकतात, अशी माहिती पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली.
एमजीएमच्या रुख्मिनी हॉलमध्ये गुरुवारी मराठवाड्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता स्नहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मंजुळा सतीश माथुर यांच्यासह विशेष महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र व नांदेड परिक्षेत्र मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद पोलिस अधीक्षक आरती सिंह, पोलिस अधीक्षक जालना रामनाथ पोकळे, पोलिस अधीक्षक उस्मानाबाद पंकज देशमुख, बीड पोलिस अधीक्षक एस. श्रीधर, हिंगोली पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, नांदेड पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह शहर पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दहावी, बारावी व तसेच विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच विशेष प्राधिकारी प्राप्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार माथुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एकलव्य योजनेतून लघु उद्योगासाठी पोलिस कुटुंबांना पोलिस महासंचालक यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. लघु उद्योगासाठी पोलिस कल्याण सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली. यावेही महिला बचत गटाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मंजुळा माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस महासंचालक माथूर यांनी मराठवाड्यातील पोलिस कल्याण निधीतून घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सध्या पोलिस विभागात उच्चशिक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले पोलिस अधिकारी येत आहेत. यामुळे गुन्ह्यांचा तपासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे, पण पोलिसांचे कुटुंब समाधानी असेल तरच त्यांची सेवाही चांगली राहिल, असे मत सतीश माथूर यांनी व्यक्त केले.
\Bमहासंचालकांनी टोचले पोलिसांचेच कान
\B
कर्तव्य बजावताना अनेक वेळा परिस्थिती गंभीर होते. अवघड परिस्थितीत लाठी-काठी वापरावी लागले. पण कधी कधी डोकेही वापरावे लागेल. अजूनही तरी डोके वापरण्यासाठी कोणता कर लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आपली वर्तणूक सुधारावी, गुटाखा, दारूचे व्यसन सोडावे, उद्धट भाषा वापरू नये, या सवयी कायम राहिल्यातर भविष्य अवघड राहील. तुमचीच मुले तुम्हाला धडा शिकवतील, या शब्दात पोलिस महासंचालकांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे कान टोचले.