प्रत्येकाने जबाबदारी ओळखल्यास पर्यावरण संवर्धन शक्य
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद
पाणी टंचाई, प्रदूषण, कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असते. आजघडीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर स्वच्छतेसह जलसंधारण, वृक्षारोपण, शौचालयाचे काम मोठ्या प्रमाणावर होते आहे. प्रत्येकाने समस्या सोडवणुकीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या ओळखून कार्य केल्यास पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. 'टाइम्स ग्रुप'च्या आयोजित 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री'सोहळ्यावेळी ते बोलत होते.
जालना रोडवरील खिंवसरा हेडक्वार्टर येथे शुक्रवारी (२९ जून) मोठ्या उत्साहात झालेल्या 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' सोहळ्यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, महात्मा गांधी मिशनचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एनआयपीएमचे अध्यक्ष सुनील सुतवणे, 'टाइम्स ग्रुप'चे रिस्पॉन्स हेड संदीप कोल्हटकर, नागपूर सब ऑफिस हेड प्रसाद पुल्लीवार, ब्रँच व्हर्टिकल हेड (नागपूर) रूपेश भाईक, औरंगाबाद सब ऑफिस हेड महेश जहागीरदार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहायक संपादक प्रमोद माने यांनी 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
'महाराष्ट्र टाइम्स', 'टाइम्स ऑफ इंडिया', 'इकॉनॉमिक्स टाइम्स'च्या सौजन्याने 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी आपापल्या परीने कार्य करणाऱ्या कंपन्या, उद्योग, शाळा, हॉस्पिटल्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी पॅरासन मशिनरी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, रेयॉन इल्युमिनेशन्स, लोया प्री इंजिनीअर्ड बिल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, मॅट्रो मेटल इंडस्ट्रीज, पावरकॉन, विश्वा टुलिंग सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल, अशोक पोरे- मृदुला टुर्स अँड ट्रॅव्हल्स, एम्स हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर, महात्मा गांधी मिशन, शिवाजी दांडगे, एएसआर इंडस्ट्रीज, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड, एमआर ग्रुप, रेन ड्रॉप आरओ सोल्युशन्स, पोरेज मृदुला टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि., नारायणा आयआयटी अँड पीएमटी अकॅडमी, वैद्य अकॅडमी, अमृत डेव्हलपर्स, आयसेन्स, खिंवसरा ग्रुप यांना 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
यावेळी 'क्लीन एनर्जी अॅवार्ड', 'इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन अॅवार्ड', 'एक्सलन्स इन वॉटर मॅनेजमेंट अॅवार्ड', 'एक्सलन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अॅवार्ड' आणि 'सीएसआर अॅवार्ड' देऊन टाइम्सने सन्मानीत केले. पर्यावरणाप्रती जागरूकता निर्माण करत भरीव योगदानाबद्दल 'टाइम्स ग्रुप'च्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि आरोग्यदायी तुळशीचे रोप देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पूजा मदनानी यांनी केले.
कौतुकास्पद उपक्रम-
बागडे यांनी पाठ थोपटली
'टाइम्स ग्रुप'च्या वतीने ठेवलेल्या 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री'उपक्रमाचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कौतुक केले. पर्यावरणपूरक काम करणाऱ्यांची संख्या वाढायला हवी. थोड्या आणि मोजक्याच लोकांनी यासाठी पुढाकार घेऊन भागणार नाही. सामूहिक सहभागाने पर्यावरण संवर्धन शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश देशभर प्रभावीपणे पोहोचला आहे. आज विविध संस्था, कंपन्या स्वच्छतेच्या बाबतीत भरपूर काम करत आहे. असंख्य गावकऱ्यांनी मनावर घेतल्याने आणि सरकारी पातळीवरून योगदान मिळाल्याने कितीतरी गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. सध्या आपल्या शहरात कचऱ्याची समस्या उग्ररूप धारण करत आहे, परंतु ही समस्या आज उद्धभवलेली नसून अनेक वर्षांपासूनची खदखद आहे. वेळीच त्यावर तोडगा काढता न आल्याने त्याने भीषण रूप दाखवले आहे. पाण्याची समस्या सुद्धा तशीच आहे. पाण्याचा योग्य वापर, पावसाच्या पाण्याचे संकलन न झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली. एखादी गोष्ट कमी पडल्याशिवाय आपल्याला त्याचे महत्त्व ओळखता येत नाही. पाण्याचे योग्य नियोजन, गैरवापर टाळणे, गरजेपुरतेच पाणी वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, यासारख्या गोष्टी आवश्यक आहेत.
'त्या' लोकांचे मोबाइल नंबर झळकवा
आजघडीला शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झालेली असताना संबंधित कंत्राटदार, अधिकारी, नगरसेवक आपल्या जबाबदाऱ्या योग्यपणे पार पडताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक फलक लाऊन त्यावर कचरा निर्मूलनाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि नगरसेवकाचे नाव आणि मोबाइल नंबर लिहायला हवा. जेणेकरून त्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकेल, अशी लाखमोलाची सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. जर त्या फलकावरील मोबाइल नंबर बंद करून कामात कुचराई कोणी करत असेल, असे निदर्शनास आल्यास त्यावर प्रशासनाने कठोर कारवाई देखील करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.
-------------------------
'टाइम्स ग्रुप' ठरतोय मार्गदर्शक - महापौर
समाजाला काय हवे ते देण्याचे काम 'टाइम्स ग्रुप' करतो. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने विविध विषयांवर प्रकाश टाकून समाजाच्या हिताची जपवणूक केली जाते. आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे आयोजन या ग्रुपच्या वतीने केले जाते. त्याला सर्व घटकांतून प्रतिसादही मिळतो. पर्यावरणाच्या संवर्धनाची जबाबदारी सगळ्यांची असली तरी त्या-त्या संस्थांना पुरस्काराच्या रूपाने सन्मानीत करणारा 'सिटीजन ऑफ औरंगाबाद व जालना- सिझन थ्री' सोहळा समर्पक ठरला, असे प्रतिपादन महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले.
निसर्गाने आपल्याला भरपूर गोष्टी दिल्या असल्या तरी नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर वाढल्याने प्रदूषण, पाणी टंचाईसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. पाऊस मोठ्या प्राणावर व्हावा, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. यंदा आम्ही ७० हजार झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सर्वानी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आज कचऱ्याची समस्या सोडवणुकीसाठी राज्य शासनाकडून ९० कोटी रुपयांची तरतूद झालेली असली तरी प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास भविष्यात या समस्या इतक्या उग्ररूप धारण करणार नाहीत, असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केला.