म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस असतानाही कृषीच्या लातूर आणि औरंगाबाद विभागात केवळ ३३.६६ टक्के खरीप पेरणी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या खंडामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.
लातूर विभागात लातूर, नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात ३६.९६ टक्के, तर औरंगाबाद विभागात तुलनेत कमी पाऊस असल्यामुळे औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात केवळ २८.८३ टक्के पेरणी झाली. जून महिन्यात लातूर, उस्मानाबाद तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला होता. मात्र गेल्या आठवड्याभरपासून पावसाने दडी मारली आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस असल्याचा फटका पेरण्यांना बसला आहे. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाला असला तरी पेरणी करण्यास बळीराजा अद्याप पुढे आलेला नाही.
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या केल्या, मात्र पावसाचा मोठा खंड आणि बोंडअळीचे आक्रमण यामुळे बहुतांश खरीप पीक होरपळले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी यंदाच्या परिस्थितीत पेरणी करण्यास धजावत नाहीत. आतापर्यंत लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. दमदार पाऊस असतानाही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. आतापर्यंत खरिपाची २०४८ हेक्टरवर सर्वाधिक (५३ टक्के) पेरणी हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. दमदार पाऊस झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १०९२.१६ हेक्टरवर (२३.११ टक्के) पेरणी झाली. औरंगाबाद विभागात १०२३ हेक्टरवर खरीप तृणधान्य, ५२७ हेक्टरवर कडधान्य, ८९७ हेक्टरवर गळीत धान्य, तर पाच हजार ५३५ हेक्टरवर कापूस पेरण्यात आला आहे. विभागात ८७४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. लातूर विभागात ४५९ हेक्टरवर तृणधान्य, २३८४ हेक्टरवर कडधान्य, ५३०२ हेक्टरवर गळीत धान्य, तर १० हजार ७८७ हेक्टरवर कापूस पेरण्यात आला.
----.
जिल्हानिहाय पेरणी (जून अखेर)
जिल्हा....................... प्रत्यक्ष पेरणी हेक्टर..................... टक्के
औरंगाबाद........................२३१६.५८...............................३२.९२
जालना...........................१३६६.०९.............................२३.५८
बीड...............................२०६२.०४...............................२९.०७
एकूण औरंगाबाद विभाग.........५७४४.७१.........................२८.८३ टक्के
लातूर................................१०३२.६५..............................२३.७३
उस्मानाबाद..........................१०९२.१६........................२३.११
नांदेड....................................४४२२.५६.........................५३.६२
परभणी................................१७९१.७६........................२८.३४
हिंगोली................................२०४८.७३........................५३.२१
एकूण लातूर विभाग.................१०७७८.८६......................३६.९६टक्के
---------------------------------------------------------------.
एकूण मराठवाडा......................१६५३२.५७ ........................३३.६६ टक्के
----------.
आतापर्यंत झालेला पाऊस (२ जुलै पर्यंत)
जिल्हा...............पडलेल्या पावसाची टक्केवारी.......... वार्षिक सरासरीशी टक्केवारी
औरंगाबाद...............७३.२.....................१५.४ टक्के
जालना....................६९.९....................१५.२ टक्के
परभणी...................१२२.२..................२२.१ टक्के
हिंगोली...................१३२.१...................२८.४ टक्के
नांदेड....................१४०.००..................२६.७ टक्के
बीड....................९३.४........................१९.४ टक्के
लातूर.................१५५.८.......................३०.७ टक्के
उस्मानाबाद.........१०६.३.......................२३.६ टक्के