म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर कचरा टाकण्यासाठी तात्पुरती जागा दिली आणि त्यांनी प्रशासनाचा प्रश्न सोडवला. याचेच फळ चिकलठाणा येथील वयोवृद्ध शेतकरी श्यामराव बकाल भोगत आहेत. दोन महिन्यानंतरही त्यांच्या जागेवरचा कचरा उचलणे तर सोडाच, त्यांच्यावरचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यातही पालिकेचे निर्दयी प्रशासन टाळटाळ करत आहे. कचरा प्रश्न पेटल्यावर चिकलठाणा गट क्रमांक ६१४मधील जकात नाक्याच्या जागेवर कचऱ्याने भरलेल्या गाड्या पाठवल्या गेल्या. तेव्हा जागा मालक श्यामराव बकाल यांनी विरोध केला. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पालिकेतर्फे बकाल यांना पत्रही दिले. त्यात म्हटले आहे की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गट क्रमांक ६१४ ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात जागा २५ एप्रिल ते २५ जून २०१८ या महिन्यांसाठी वापरू. त्यानंतर प्रक्रिया केलेला सर्व कचरा उचलू. आज सपाट असलेली जमीन दोन महिन्यांनंतर पालिकेतर्फे सपाट करून दिली जाईल. प्रशासनाच्या या पत्रामुळे बकाल यांनी आजली १६ गुंठे जागा कचरा टाकण्यासाठी दिली. आता दोन महिने उलटूनही त्या जागेवरचा कचरा उचलला जात नाही. बकाल हे वयोवृद्ध आहेत. त्यांना सतत पालिकेत या कामासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे पुत्र गोपाळ बकाल यांनी याबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. लेखी आश्वासनानुसार जागेवरचा कचरा उचलून घ्या, अशी मागणी केली. महापौरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित अधिकाऱ्याला तसे आदेश दिले, पण अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांचे आदेश ऐकले नाहीत. त्या जागेवर सुमारे एक हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. काही जणांनी तो जाळून टाकल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. \Bजिल्हाधिकाऱ्यांनीही आश्वासन पाळले नाही \Bबकाल यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन महापौर आणि जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले होते. हे आश्वासन देखील पाळले नाही. महापालिकेने जकात नाक्यासाठी बकाल यांची जमीन घेतली. त्या बदल्यात बकाल यांच्या दोन मुलांना महापालिकेत नोकरीला लावून घेण्याचे व त्या जागेचे 'एनए' करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे आश्वासन पालिकेने पाळले नाही. त्यामुळे महापालिकेने दोन वेळा फसवणूक केली आहे, अशी भावना बकाल कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट