म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
लहान मुलास झोपवत असल्यामुळे इथे गाणे म्हणू नका, असे म्हटल्याने घराचे दार तोडून घरात घुसून जातीवाचक शिविगाळ व मारहाण करणाऱ्या १३ आरोपींना सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी दीड हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली. कोर्ट उठेपर्यंत शिक्षाही सर्व आरोपींना ठोठावण्यात आली.
या प्रकरणी शेतमजूर देवचंद रामचंद रमणे (५५, रा. करंजखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची विवाहित मुलगी सविता संतोष गरंडवाल ही धोंडे जेवणासाठी माहेरी करंजखेडा येथे आली होती. ११ जुलै २०१५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ती आपल्या लहान मुलाला झोका देत त्याला झोपवत होती. त्यावेळी सविताच्या काकाच्या ओट्यावर त्याच परिसरातील काही तरुण जोरजोरात गाणे म्हणत होते. त्यामुळे 'इथे गाणे म्हणून नका' असे ती त्यांना म्हणाली असता, त्यातील काहींनी तिला जातीवाचक शिविगाळ करीत गालात चापट मारली व तिथून निघून गेले. फिर्यादी व फिर्यादीची पत्नी हे सायंकाळी शेतावरुन आल्यानंतर सविताने त्यांना घडला प्रकार सांगितला. त्याचा जाब फिर्यादीच्या पत्नीने विचारला असता, शेख आरेफ उर्फ शेख गुड्डू शेख लड्डू (२६), शेख सलमान शेख लड्डू (२०), जाकेर शहा बाबू शहा (१९), वसीम खान सुबान खान (२२), नूर मोहम्मद गुलाम मोहम्मद (३५), शेख जमीर शेख सलीम (२५), शेख लड्डू शेख मुनीर (४५), शेख बशीर शेख नसीर (२२), इसुफ शहा हुसेन शहा (३४), सय्यद जमीर सैय्यद मुसा (२०), मोहम्मद अस्लम मोहम्मद नसीर शेख (२०), शेख रफिक शेख सलीम (२२) व शेख अजीज शेख कलीम (२०, सर्व रा. करंजखेडा झोपडपट्टी) या आरोपींनी त्याचदिवशी रात्री आठच्या सुमारास फिर्यादीचे घर गाठून जातीवाचक शिविगाळ केली. त्यामुळे फिर्यादी व त्याचे कुटुंबीय घरात लपले असता, आरोपींनी फिर्यादीच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश केला आणि पुन्हा शिविगाळ व मारहाण केली. तसेच सामानाची नासधूस केली. दरम्यान, फिर्यादीच्या कुटुंबातील एकाने पोलिसांना फोन केला असता, पोलिसांनी फिर्यादीच्या कुटुंबियांची सुटका केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि १४३, १४७, ४५२, ४२७, ३२३, ५०६ तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचे ३(१)(१०)(११) व मुंबई पोलिस कायद्याच्या १३५ कलमान्वये पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चांगल्या वर्तणुकीच्या बाँडचे आदेश
खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये सविता, सविताचा भाऊ सुनिल देवचंद रमणे व डॉ. अनुप इंगोले यांची साक्ष महत्वाची ठरली. दरम्यान, प्रकरण गावातील तंटामुक्तीत मिटवले असे कारण देत फिर्यादीसह तिघेजण फितूर झाले. तरीही कोर्टाने सर्व १३ आरोपींना भादंवि ४५२ कलमान्वये सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी, भादंवि १४७ कलमान्वये आरोपींना कोर्ट उठेपर्यंत व प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३० दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याचवेळी सर्व १३ आरोपींना चांगल्या वर्तणुकीचा एक वर्ष कालावधीचा बाँड दाखल करण्याचेही आदेश कोर्टाने दिले.