म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मालवाहतूकदारांचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. वाळूज, शेंद्रा भागातून मालाची वाहतूक शंभर टक्के बंद झाली आहे. याशिवाय कच्च्यामालाची आवकही थांबली आहे. याचा फटका सोमवारपासून उद्योग, व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया मोटार काँग्रेसने शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारीही संपात सामील झालेल्या ट्रक चालकांची भेट घेतली. याशिवाय मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती घेतली असता दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकची संख्याही कमी झाल्याचे आढळले. वाळूज, शेंद्रा भागातून रविवारी मालाची आवक-जावक पूर्णत: थांबली. ट्रकमधून माल उतरवणे बंद झाले आहे. दरम्यान, संपात सहभागी झालेल्या ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने सोमवारी मागण्यांवर निर्णय दिला नाही, तर मंगळवारपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करण्याचे संकेत देण्यात आले. केंद्र शासनाने शनिवारी टोल नाके व महत्त्वाच्या एन्ट्री पॉइंटवरून ट्रकची माहिती मागवली आहे. संपाचा परिणाम टोल नाका कंत्राटदारांनाही बसला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी औरंगाबादहून मुंबई आणि पुण्याकडे जाणारी मालवाहतूक बंद केली होती. प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रक थांबवले आहेत. बीड, लातूर, जळगाव, धुळे तसेच इतर मार्गावर जाणारे ट्रक थांबवण्यात आले आहेत.
\Bडिझेल विक्रीत घट \B
मालवाहतूक बंध झाल्याचा परिणाम शहरातील डिझेल विक्रीवर झाला आहे. दररोज सरासरी तीन लाख लिटर डिझेल विकले जात होते. ही विक्री सध्या दीड लाख लिटरवर आली आहे.
………\Bसंप चिघळणार \B
देशात अनेक ठिकाणी संपाला झुगारून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांच्या ट्रकचे नुकसान करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद येथे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सोमवार पासून ही परिस्थिती चिघळण्याची शक्यता ट्रान्सपोर्टरने व्यक्त केली आहे.
\B…………उद्योगांवर उद्यापासून जाणवेल परिणाम \B
मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा उद्योगावर परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वाळूजमधील अनेक उद्योगांना सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त सुटी आहे. त्यामुळे मंगळवारपासून संपाचा परिणाम मोठ्या उद्योगांना जाणवणार आहे.
वाळूज, रेल्वेस्टेशन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत अनेक मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल स्टॉकमध्ये ठेवला जातो. मात्र हा स्टॉक चार दिवसांपेक्षा जास्त नसतो. अनेक उद्योगांकडे सोमवारपर्यंत पुरेल एवढा कच्चा माल असू शकतो. मात्र त्यानंतर जर संप सुरूच राहिला तर उद्योगांची अडचण सुरू होणार आहे.
अजून संपाचा परिणाम दिसून आला नाही. मात्र मंगळवारपासून त्याची तीव्रता जाणवायला सुरू होईल. स्टॉक शिल्लक असल्याने आतापर्यंत फारशा अडचणी उद्योगांना आल्या नाहीत.
-राम भोगले, अध्यक्ष सीएमआयए
लघुउद्योजकांच्या मालाचा पुरवठा करण्यास सध्या तरी अडचणी नाहीत. अनेक ठिकाणी मोठ्या ऑर्डर गुरुवारपूर्वी दिल्या गेल्या. मालवाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.
-किशोर राठी, अध्यक्ष मासिआ