म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा टाकण्यासाठी पडेगाव आणि हर्सूल येथील जागा नागरिकांच्या विरोधामुळे बंद असल्याने महापालिकेची भिस्त आता चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागांवरच आहे. गेल्या दोन दिवसात पडेगाव येथे कचरा टाकलेला नाही. वर्गीकरण केलेला कचरा टाकण्यासाठी संनियंत्रण समितीने हर्सूल-सावंगी, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर कचरा टाकून प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रक्रिया करणारी यंत्रे अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे कचरा पडून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचरा टाकण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे. त्याचा परिणाम म्हणून हर्सूल-सावंगी येथील जागेवर कचरा टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंदच आहे. पडेगाव येथील जागेवर पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला, पण त्यानंतर दोन दिवसांपासून या ठिकाणी देखील कचरा पाठवण्यात आला नाही. या प्रकारामुळे चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागांवरच कचरा टाकण्याचा पर्याय महापालिकेच्या समोर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांचनवाडी येथील जागेवर दररोज वीस ट्रक कचरा टाकला जात आहे. चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवरही कचरा टाकला जात आहे. येथे कचऱ्यावर बायोकल्चरची प्रक्रिया केली जात आहे. हर्सूल-सावंगी आणि पडेगाव येथील जागांवर कचरा टाकणे सुरू झाल्यास शहरातील कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल, असे मानले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट