म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कचऱ्याला हर्सूल-सावंगी येथील नो एन्ट्री कायमच आहे. पडेगाव येथील साइट देखील गुरुवारी बंद होती. त्यामुळे फक्त रमानगरात विकेंद्रिकरणाच्या साइटवरच कचरा टाकण्यात आला. शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरचा कचरा उचलण्यात आला, पण बहुतेक ठिकाणी कचरा साचलेला दिसून येत होता. कचऱ्याचे वर्गीकरण करून तो टाकण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने शहराच्या विविध भागात चार जागा निश्चित केल्या आहेत. याशिवाय देशमुखनगर आणि रमानगर येथे विकेंद्रीकरणातून प्रकल्प उभारले जाणार आहेत. संनियंत्रण समितीने निश्चित केलेल्या जागेपैकी हर्सूल-सावंगी येथील जागेवर नागरिकांनी कचरा टाकण्यास परवानगी दिली नाही. कचऱ्यावरच्या प्रक्रियेचे काय, मशीन केव्हा बसवणार ते सांगा, अशी भूमिका घेत कचऱ्याच्या गाड्यांना विरोध केला. त्यामुळे आजही हर्सूल-सावंगीच्या जागेवर कचरा टाकण्यास बंदी आहे. पडेगाव येथील जागेवर कचरा टाकण्यात येत होता, पण चार दिवसांपासून या ठिकाणी देखील कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांच्या विरोधामुळे पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला, आता पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी कचरा टाकण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी फक्त रमानगर येथील जागेवरच कचरा टाकण्यात आला. पडेगाव येथील जागेवर कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात आली आहे. निर्माण करण्यात आलेले खत शेतकऱ्यांना मोफत दिले जात आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी स्वत:च्या शेतासाठी हे खत नेण्याची तयारी दर्शवली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट