म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आता आपले स्वप्न देशातील निरक्षरता, सामाजिक विषमता सामाजिक व आर्थिक बदल दूर करणे हे असायला हवे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. सामाजिक बदलांसाठी एकमेव माध्यम म्हणजे शिक्षण. दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षातही आपण सामाजिक विषमतेच्या जोखडातून बाहेर पडलो नाही. आता तुम्हा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. सदैव जिज्ञासू बनून सत्याचा शोध घ्या आणि सदैव पुस्तकाची श्रीमंती बाळगा, असे आवाहन यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. वेद प्रकाश यांनी केले. मंगळवारी (३१ जुलै) एमजीएमच्या रूक्मिणी सभागृहात महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिट्यूट (एमजीएम) ऑफ हेल्थ सायन्स अभिमत विद्यापीठाचा नववा पदवीदान समारंभ पार पडला. त्यावेळी प्रा. वेद प्रकाश मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, कुलपती डॉ. नारायण खेडकर, कुलगुरू डॉ. शशांक दळवी, परीक्षा नियंत्रक डॉ. नितीन कदम, प्रबंधक डॉ. राजेश गोयल, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, अधिष्ठाता जी.एस. नरशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुश कदम, विश्वस्त प्रताप बोराडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या नवी मुंबई व औरंगाबाद येथील हेल्थ सायन्सच्या ५५१ पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये मेडिकल, नर्सिंग, फिजिओथेरपी व अप्लाइड सायन्स शाखेतील ४७७ विद्यार्थी उपस्थित होते. अतिशय शिस्तपूर्ण सोहळ्यास विद्यार्थांसह पालकही उपस्थित असल्याने कँम्पसमध्ये प्रोजेक्टर लावण्यात आले होते.
प्रा. वेद प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत एमजीएम संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, 'शैक्षणिक संस्था सुरू करणारे विचार दूरगामी असतात. शिक्षण हा विचार आहे. शिक्षणानेच व्यक्तीच्या जीवनात सुसूत्रता येते. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे काम इथे होते. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात मर्यादित संसाधने असूनही आपली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. तरीही प्रत्येक शैक्षणिक संस्थेने, शिक्षकांनी स्वतःचे सातत्याने परीक्षण करायला हवे. आपल्याकडचे अभ्यासक्रम, त्याची उपयोगिता पहायला हवी. कोणतेच विद्यापीठ कधीच सर्वोत्तम असूच शकत नाही. गुणवत्ता, सातत्य व नाविण्याचा शोध घेण्याचे कार्य विद्यापीठाने करायलाच हवे, पण आपल्याला एक सवय जडली आहे. जी गोष्ट किचकट वाटते आपण ती आपण सोडून देतो. अवघड आहे पण करून पाहू हा विचार करणे शिका.'
पदवीदान कार्यक्रम नवी मुंबई व औरंगाबाद असा क्रमाक्रमाने घेतला जातो. यावेळी १ सुपरस्पेशॅलिटी, १६ पीएचडी, २७ एम.एस., ६६ एम.डी., २१५ एमबीबीएस आदी पदवी प्रदान करण्यात आल्या. मुख्य कार्यक्रम संपल्याची घोषणा होताच संपूर्ण कॅम्पसमध्ये एकच गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांवर पालक व शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. मुलांसोब फोटो काढताना तर अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. यावेळी उपाधिष्ठा डॉ. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. डॉ. एस .एच. तालिब, डॉ. शिल्पा देशमुख, डॉ. एस. एन. कदम, अशोक पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अनुप्रिया महर्षी यांनी सूत्रसंचालन केले.
आयुष्यभर विद्यार्थी बनून रहा
प्रा. वेद प्रकाश यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचे अॅडिक्ट होऊ नका, असे आवाहन केले. नको त्या गोष्टीचा ताण घेण्यापेक्षा स्वतःचा स्ट्रेस मॅनेज करणे शिका. आयुष्यभर विद्यार्थी रहा. पुस्तकांना तुमचे मित्र करा. एक वेळ चैनीच्या गोष्टी बाजूला करा, पण पुस्तकांचा खजिना तर हवाच. कामाच्या ठिकाणी तुमचे ग्रंथालय हवे. आयुष्यात यशापेक्षा अपयश कदाचित जास्त येते, पण यशाचा मार्ग हा कठीण परिश्रमातून जातो. यासाठी तुमचा अॅटिट्यूड विकसित करा. अॅटिट्यूडसाठी स्वयंशिस्त व नम्रता हवी. आपल्याला दुसर्यांविषयी खूप जास्त माहिती असते, पण अंतर्मनात डोकवा आणि सर्वप्रथम स्वतःची ओळख करून घ्या, असे ते म्हणाले.