एका कामासाठी दोन मित्र चालले होते. ज्या मित्राची मोटारसायकल होती त्याला दुसऱ्या मित्राने विचारले, 'भावा तुझ्या गाडीत पेट्रोल आहे का?,' त्या मित्राने उत्तर दिले,'भाऊ ३३ रुपयांचे पेट्रोल सकाळीच टाकलं आहे.' हे ऐकताच मागे बसलेल्या मित्राने पेट्रोल संपणार नाही का? असं विचारताच गाडीने जीव सोडला; तिच्यातील पेट्रोल संपले. दोघांनी मोटारसायकल कशीतरी ढकलत एका वस्तीपर्यंत आणली. तेथे एक ओळखीचा माणूस भेटला. त्याच्या दुचाकीतून पेट्रोल काढून घेऊन स्वत:च्या वाहनात टाकून घरापर्यंत आले. खूप वेळेपासून शांत असलेल्या मित्राचा राग अचानक उफाळून आला. 'अबे, गधड्या ३३ रुपयांत पूर्ण शहर फिरतो का? तुझी मोटारसायकल हवेवर चालते का? जर तो भेटला नसत तर मोटारसायकलवर मी बसलो असतो अन् ती तुला ढकलावी लागली असती.' मोटारसायकलच्या मालकाने ते ऐकून घेतले. मित्राचे घर आले. तेथे त्याच्या वडिलांची गाडी उभी होती. पंपावर जाईपर्यंत तिच्यातील पेट्रोल दे, असे सांगताच मित्र आणखी भडकला. तो भडकल्याचे पाहून मोटारसायकल मालक हसत शांतपणे निघून गेला.
- अब्दुल वाजेद
.......
_______________________________________________________________________
सांगा, प्रस्ताव कसा द्यायचा
विवेकानंद महाविद्यालयातील प्राचार्यांचे दालन. प्राचार्य, प्राध्यापक हे माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधत होते. तेवढ्यात प्राचार्यांना फोन आला. सर, ते विद्यापीठाचे पत्र आले आहे, त्यानुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम कोणते सुरू करता येतील ते पहावे लागेल, तसा प्रस्ताव पाठवायचा आहे. प्राचार्यांनी समोरच्यांना होकार दिला. पत्र वाचून दाखवत म्हणाले,'अहो सर, पत्रात सांगितले दोन ऑगस्टपर्यंत प्रस्ताव द्या, आज तर चार तारीख आहे. पत्र लिहले ३१ जुलैला. सांगा कसा प्रस्ताव द्यायचे,' असे सांगताच सर्वांना हसू आवरता आले नाही. फोन ठेवल्यानंतर प्राचार्यही म्हणाले 'काय करावे.. अभ्यासक्रम काय, असा तयार होतो का, थोडा वेळ तर द्यावा लागेल आणि कारभार बघा.. मागितले कधी आले कधी.'
-आशिष चौधरी
_______________________________________________________________________
त्याला काय फरक पडणार
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दिल्लीहून काँग्रेसचे दोन श्रेष्ठी दोन दिवस औरंगाबादेत आले होते. त्यांनी आठही जिल्ह्यांचा आढावा घेताना नेत्यांची मते जाणून घेतली. या समितीसमोर जाताना मागविलेली कागदपत्रे तपासली जात होती. बूथ कमिटी सदस्य करताना एक छापील फॉर्म भरणे आवश्यक होते. त्यावर फोटो आणि मतदान ओळखपत्र क्रमांक अत्यावश्यक होता. एका जिल्ह्याचे काम अर्धवट राहिले होते. गांधीभवनात हे कार्यकर्ते फॉर्म भरत होते. एका कार्यकर्त्याकडे मतदान कार्ड नव्हते. त्यामुळे नंबर आठवेना. दुसऱ्या कार्यकर्त्याने हे पाहिले अन् म्हणाला की, मोबाइलमधून शोध घे. त्यावर तिसरा म्हणाला, अहो त्याला काय फरक पडतो. तीन इंग्रजी शब्द लिहा आणि आकडा टाका की कुठला तरी? ही मंडळी कुठे तपासणार आहेत. त्यावर पहिला कार्यकर्ता म्हणाला, याआधीच्या जिल्ह्याच्या आढाव्यात असेच केले होते. त्यावर आक्षेप घेतला होता. कशासाठी अडचण करून घेता. आता तर सुरवात आहे. यावेळी फार सूक्ष्म नोंदी ठेवाव्या लागणार आहेत. नाहीतर आपले काही खरे नाही. त्यावर कार्यकर्त्यांना घरी संपर्क साधून मतदान कार्ड क्रमांक मिळवून फॉर्मवर लिहिला.
-मकरंद कुलकर्णी
_______________________________________________________________________
असाही प्रादुर्भाव...!
अलीकडे आंदोलनाचे कल्पनातीत प्रकार पुढे आले आहेत. आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून आंदोलकांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते हे प्रत्यक्ष कृतीवरून समोर येत आहे. अशा आंदोलनांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. याचा प्रत्यय छावणी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत आला. यंदाची परिषदेची सभा वादळी ठरली ती बंद दरवाजाआड चर्चेमुळे. सभेत सदस्यांव्यतिरिक्त कोणालाही बोलायचा अधिकारी नसला तरी सभेला उपस्थित राहण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि नियमानुसार बंद दरवाजाआड चर्चा करता येत नाही. तरीही तासभर बंद दरवाजाआड चर्चा सुरू असल्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा संयम संपला होता; म्हणूनच काही कार्यकर्ते बंद दरवाजासमोर निषेधाचा सूर लावत मांडी घालून बसले होते, तर दरवाजा काही केल्या उघडेनात म्हणून एक ज्येष्ठ कार्यकर्ते चक्क रेलिंगवरुन एक पाय टाकून 'दार उघडा, नाहीतर उडी मारतो' असे म्हणून गेला. त्याला काहींनी सावरले, तर भर सभेमध्ये एक ज्येष्ठ नगरसेवक आपली मागणी तावातावाने मांडत होता आणि मागणी मान्य झाली नाही तर मी वरतून उडी मारेन, असा धमकीवजा इशारा देऊन गेला. नेहमीच तावातावात बोलणाऱ्या त्या ज्येष्ठ नगरसेवकाला लागलीच शांत करण्यात आले खरे; पण आंदोलनाचा प्रादुर्भाव पाहून अनेकांना हसू काही आवरले नाही.
- निखिल निरखी
.....
_______________________________________________________________________
मी भांडी परत करायचो
लातूर येथील बाबासाहेब परांजपे फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त औरंगाबाद शहरात रविवारी कार्यक्रम झाला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाला उजाळा देणारी अभ्यासपूर्ण भाषणे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. दिवंगत स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेब परांजपे यांच्या 'साधू वृत्ती'च्या काही आठवणींना माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी उजाळा दिला. 'या लढ्यातील नेते पांढरे कपडे घालत असले तरी आतून भगवे वस्त्र नेसत असावे. कारण संसाराचा फारसा विचार न करता त्यागी वृत्तीने ते जगले. मी लातूरला परांजपे यांच्या घराशेजारी राहत होतो. मित्राच्या मुलाच्या घरात काय कमी आहे याकडे परांजपे यांचे लक्ष असायचे. मी नुकताच प्राध्यापक झालो होतो आणि पगार २०० रुपये होता. तुझ्या घरात एवढे लोक येतात आणि फक्त दोन कपबशा आहेत, असे त्यांनी विचारले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत:च्या घरातील कपबशा आणून माझ्या घरात ठेवल्या. बादली, कळशी, वाट्या असे बरेच सामान आणून टाकत. सौ. परांजपे नोकरीनिमित्त बाहेरगावी असायच्या. पंधरा दिवसांनी परतल्यानंतर आपले घर बरेचसे रिकामे झाल्याचे त्यांच्या लक्षात येई. मग परांजपे घरी नसताना मी सगळी भांडी आणि वस्तू परत करायचो. पण, पुन्हा तोच प्रकार घडायचा' अशी आठवण चपळगावकर यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला.
-तुषार बोडखे