म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शैक्षणिक शुल्कातील भेदभाव, पुढाऱ्यांविरुद्धचा राग, मराठा समाजातील तरुणांच्या मनातील खदखत मोर्चाच्या रुपाने उफाळून आली आहे. संपूर्ण राज्यात अत्यंत शिस्तबद्ध आणि लाखोंच्या संख्येने आदर्श मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाच्या कोणत्याही मोर्चाला नेता नाही हीच मोर्चाची मोठी ताकद आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा. प्रदीप सोळुंके यांनी केले.
विचार व कल्पनांचे आदानप्रदान व्यासपीठ असलेल्या मंथन सहविचार सभेमध्ये सोमवारी (१३ ऑगस्ट) मराठा आरक्षणावर प्रा. प्रदीप सोळुंके यांनी मांडणी केली. यावेळी ते म्हणाले, आज मराठा समाजातील तरुणांची अवस्था 'निसर्ग पिकू देईना आणि सरकार शिकू देईना' अशी झाली आहे. खेड्यांतील सर्वसामान्यांच्या घरातील मुला-मुलींचे प्रचंड हाल आहेत, हे भयंकर आहे. आर्थिक दर्जा घसरल्यानंतर सामाजिक दर्जाही घसरतो, मराठा समाजाचा परंपरागत धंदा शेती असल्याने इतर व्यवसाय करू शकत नाही. अनेक लोक म्हणतात की मराठ्यांकडे 'वावर आणि पॉवर' आहे मग आरक्षणाची काय गरज? मात्र आज दिवसेंदिवस पिढ्यानुसार शेती मोठ्याप्रमाणवर कमी झाली, तर 'पॉवर' हा केवळ लोकसंख्येचा परिणाम आहे, असे ते म्हणाले.
आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या मोर्चाची सुरुवात औरंगाबादमधून झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी पहिली आत्महत्याही औरंगाबाद जिल्ह्यातच झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. समाजाची मोठी लोकसंख्या, अनेक संघटना, उपजाती, ज्या नेत्याने मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला तो नेता स्वत:चाच फायदा करुन घेत असल्याचे निदर्शनास आल्याने मराठा समाज एकत्र होऊ शकला नाही. मात्र आता आरक्षणाच्या मागणीसाठी समाज एकत्र आला आहे. हा आकोश दूर करावयाचा असेल, तर शैक्षणिक शुल्कात सवलत, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आर्थिक विकास मंडळाला निधी, व रोजगार मिळवून दिला पाहिजे, असे मत प्रा. सोळुंके यांनी व्यक्त केले.
यावेळी ज्ञानप्रकाश मोदानी, प्रा. भारत शिरसाट, किशोर चव्हाण, राजेंद्र दाते पाटील, सुभाष लोमटे, कॉ. मनोहर टाकसाळ, अण्णा खंदारे, उद्धव भवलकर आदींची उपस्थिती होती.