म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड सिल्लोड - सोयगाव तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत व शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह मागण्यांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या चक्री उपोषणाला सिल्लोड - सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आदी मागण्यांच्या घोषणांसह सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या चक्री उपोषणात काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस व सलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांसह पीडित शेतकरी सहभागी झाले. यादरम्यान दोन-तीन वेळा पावसाचे फटकारे पडले, परंतु उपोषणार्थींचा जोष कमी झाला नाही. सिल्लोड - सोयगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली. शेतीची सर्व मशागत करण्यात आली. बी - बियाणे, खते यांवर पैसे खर्च करण्यात आले. मध्यंतरी अचानक एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांची मेहनत व पैसे वाया गेले आहेत. यामुळे शेतकरी खुपच हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या बी - बियाणे, खतांसह एका वर्षासाठी एकरी २५ हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह सिल्लोड - सोयगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. यावेळी आमदार अब्दुल सत्तार, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, प्रभाकर काळे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, प्रा. मन्सूर कादरी, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतला बन्सोड, पंचायत समिती सभापती धरमसिंह चव्हाण, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, अली चाऊस, शेख सलीम, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, कौतिकराव बडक, सलीम हुसेन, रुपेश जैस्वाल, अक्षय काळे, नगरसेवक रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम, सत्तार हुसेन, राजू गौर, लड्डू पटेल, कैसर आझाद, शेख बाबर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे, अब्दुल रहीम, दामोधर गव्हाणे, दारासिंह चव्हाण, हनिफ मुल्तानी, मनोज झंवर, राजूमिया देशमुख, पंजाबराव चव्हाण, अनिस पठाण आदीची उपस्थिती होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट