म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तब्बल ५० हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.
राज्यात १९९०पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविल्यामुळे सुमारे १६ लाख हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आलेले आहे. केंद्र सरकारने २००५पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केल्यानंतर त्यातून राज्य सरकारने फळबाग लागवडीसाठी अर्थसाह्य देण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीसाठी दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. केवळ जॉब कार्ड नसल्याने अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन अशा शेतकऱ्यांसाठी नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय २० जून २०१८ रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फळबाग लागवड योजना या खरीप हंगामापासून सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मिळावा यासाठी औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून १५ हजार १२७, बीड जिल्ह्यातून दहा हजार ७७७, तर जालन्यातून २४ हजार १२७ असे एकूण ५० हजार ७९ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
\Bअनुदान वितरण तीन वर्षांत\B
आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ, आवळा, चिंचेच्या विकसित जाती, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजिर, नारळ रोपे बाणावली, नारळ रोपे टी-डी आदी फळ लागवडीचा समावेश या योजनेत आहेत. फळबाग लागवडीसाठी तीन वर्षांच्या कालावधीत प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षी अनुक्रमे ५०, ३० आणि २० टक्के अर्थसाह्य दिले जाते. फळबाग लागवडीसाठी कोकणात कमाल दहा, तर उर्वरित महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टरपर्यंत लाभ दिला जातो. दरम्यान, आलेल्या अर्जाची छाननी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.