म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'या नभाने या भुईला दान द्यावे', 'मी रात टाकली', 'मन चिंब पावसाळी', 'जांभूळ वनात' अशा एकाहून एक सरस, ग्रामीण समाजजीवनाचे वास्तव मांडणाऱ्या कविता, गीतांचे अभिवाचन आणि त्यावरील आधारित नृत्यसंगीताच्या कार्यक्रमात शनिवारी रसिक चिंब झाले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सहकार्याने नवचेतना फाउंडेशन - अनुनाद कलाविष्कारतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला औरंगाबादमधील रसिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संहितालेखन व निवेदन वृषाली श्रीकांत यांनी केले. रूपाली पाटील, वृषाली श्रीकांत, श्रीकांत उमरीकर यांनी अभिवाचन केले. निरंजन भालेरावच्या सुरेल बासरीने आणि राजश्री पोहेकर-कुलकर्णी यांच्या नृत्य दिग्दर्शनाने रंगत भरली. महानोरांच्या विविध आशयाच्या कविता कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. तर, नृत्य सादरीकरणातून गीतेही सादर करण्यात आली. श्रावणी पाटील, शर्वरी कुलकर्णी, अपूर्वा कुर्डीकर, शीतल गलांडे, समीक्षा आचार्य, प्रेरणा शेळके, साक्षी पिसाळ, सिद्धी सदावर्ते, सानिका घोडके, शिवाली गायकवाड, केतन हराळे, ईशान महाजन यांनी ना.धों.च्या कवितांवर बहारदार नृत्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी महानोर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, 'तुम्ही सर्व कवी रसिकांनी कवितेवर केलेल्या प्रेमामुळे मी आहे. पुणे, मुबंईच्या कलाकारांपेक्षा काकणभर छान सादरीकरण या कलाकारांनी केले आहे आणि ते माझ्या मराठवाड्याने केले. यापेक्षा स्वर्गीय सुखाचा आनंद नाही.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट