म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील भाविकांच्या घरांमधील दीड दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. हडको एन १२ येथे विसर्जन विहिरीच्या ठिकाणी काहीच व्यवस्था नसल्याने भाविकांना मूर्ती तेथे ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. ही माहिती समजल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करीत मनपा प्रशासनाला विसर्जनाची व्यवस्था करण्यास भाग पाडले. दरम्यान, जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीच्या ठिकाणीही सुयोग्य व्यवस्था करण्यात आली नसल्याने गेल्या वर्षीच्याच पाण्यात विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवात अनेक भाविकांच्या घरी दीड दिवसाचा गणपती बसवण्याची प्रथा आहे. हडको, सिडको भागातील अनेकांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला होता. गणेश विसर्जनासाठी एन १२ येथील विसर्जन विहिरीजवळ भाविकांची गर्दी झाली. मात्र, या विहिरीची स्वच्छता करण्यात आली नव्हती. विहिरीतील पाण्याची दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या पाण्यात विसर्जन कसे करावे हा प्रश्न भाविकांना पडल्याने ते मूर्ती विहिरीजवळ ठेऊन निघून जात होते. हा प्रकार मनसेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी येथे धाव घेतली. तेथे ठेवलेल्या मूर्ती डोक्यावर घेऊन ठिय्या आंदोलन केले. मनपाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पालिका अधिकारी येऊन विसर्जनाची व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत ठिय्या मांडण्याचा इशारा दिला. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे अतिरिक्त आयुक्त डी. पी. कुलकर्णी यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठून कार्यकर्त्यांसह चर्चा केली. यावेळी संतप्त नागरिकांनी गर्दी केली होती. चर्चेनंतर दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी पाण्याच्या टाकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. या टाक्यांत टँकरद्वारे पाणी भरण्यात आले. त्यानंतर गणरायांची आरती करून विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, बिपीन नाईक, सतनामसिंग गुलाटी, आशीष सुरडकर, चेतन पाटील, अॅड. निनाद खोचे, राजीव जावळीकर, मंगेश साळवे, अविनाश पोफळे, कार्तिक फरकाडे, संतोष कुटे, दीपक पवार, बाबुराव जाधव, हेमंत जोजारे, किरण जोगदंड, रोहित कार्ले, रितेश देवरे, राहुल कुबेर आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट